'तिकिटा'साठी इच्छुकांची सुरू मुंबई वारी
By Admin | Updated: July 28, 2014 13:56 IST2014-07-28T13:48:48+5:302014-07-28T13:56:33+5:30
विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांकडून मुंबई वारी सुरू असून नारायण राणे यांचे सर्मथक माजी आमदार रामकृष्ण पाटील यांची उमेदवारीसाठी 'फिल्डिंग' लावली आहे.

'तिकिटा'साठी इच्छुकांची सुरू मुंबई वारी
>भिका पाटील■ शिंदखेडा
तालुक्यात विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांकडून मुंबई वारी सुरू आहे. त्यात नारायण राणे यांचे सर्मथक माजी आमदार रामकृष्ण पाटील यांची उमेदवारीसाठी 'फिल्डिंग' लावणे सुरू आहे. तेही मुंबईत तळ ठोकून आहेत. जागा नेमकी कॉँग्रेसला की राष्ट्रवादी काँग्रेसला सुटते? या संभ्रमात कार्यकर्ते आहेत. याउलट युतीचे एकमेव दावेदार उमेदवार भाजपाचे विद्यमान आमदार जयकुमार रावल असल्याने युतीत चिंता नसल्यागत वातावरण दिसते.
आघाडीत तिकीट मिळण्यासाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे. शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ हा कोणत्या काँग्रेसकडे जाणार हे निश्चित नसले तरी दोन्ही काँग्रेसकडून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यात माजी आमदार व राणे सर्मथक शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले रामकृष्ण पाटील यांचीही उमेदवारीसाठी चर्चा आहे.
काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, रामकृष्ण पाटील, प्रमोद सिसोदे इच्छुक आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ही जागा काँग्रेस पक्षाला देण्यात आली होती. या जागेवर आता राष्ट्रवादी काँग्रेस हक्क सांगत आहे. त्यामुळे राजकीय वातावरणात रंग चढला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संदीप बेडसे, ज्ञानेश्वर भामरे इच्छुक उमेदवार आहेत. माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांची साथ इच्छुकांना असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडे दोंडाईचा नगरपालिका व पंचायत समितीचे १८ पैकी ३ राष्ट्रवादी व २ अपक्ष, असे राष्ट्रवादीचे ५ सदस्य व काँग्रेसचे ३ सदस्य आहेत. त्यात राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असल्याने जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच सुटेल, असे कार्यकर्त्यांत म्हटले जाते. काँग्रेसलाही चांगले मतदान झाल्याने दुर्लक्षित करून चालणार नाही, असे या पक्षाचे कार्यकर्ते म्हणतात. या दोन्ही काँग्रेसच्या रस्सीखेचमध्ये जागा कोणत्या काँग्रेसला सुटेल व कोणाच्या गळ्य़ात उमेदवारीची माळ पडेल हा मतदारसंघात उत्सुकतेचा भाग ठरत आहे.
शिंदखेडा हा राजकीदृष्ट्या संवेदनशील विधानसभा मतदारसंघ मानला जातो. त्यात दोन पंचवार्षिक निवडणुकांपासून भाजपाने सरशी राखली आहे. भाजप विरुद्ध काँग्रेस, अशी लढत झाली असताना पुन्हा राष्ट्रवादी जागा खेचण्याच्या तयारीत असल्याने राजकीय हालचालींमध्ये रंगत भरली आहे.
यात आघाडी झाल्यास उमेदवार कोण असेल, त्याला आपल्या व आघाडीतील साथीदार पक्षांची साथ राहील का? हा प्रश्न आता आणि निवडणुकी वेळीही चर्चेत राहणारच आहे.