कार्यकर्त्यांच्या बेशिस्तीमुळे आमदार रोहित पवार यांचा काढता पाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:55 IST2021-02-05T05:55:27+5:302021-02-05T05:55:27+5:30
जळगाव : कार्यकर्त्यांचे बेशिस्त वर्तन आणि आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार ...

कार्यकर्त्यांच्या बेशिस्तीमुळे आमदार रोहित पवार यांचा काढता पाय
जळगाव : कार्यकर्त्यांचे बेशिस्त वर्तन आणि आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांना मनस्ताप सहन करावा लागला. पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करत गोंधळ घातल्याने रोहित पवार यांना कार्यक्रम आटोपता घेऊन तेथून काढता पाय घ्यावा लागला. कार्यकर्त्यांची रेटारेटी, घोषणाबाजी अन् बेशिस्त वर्तन पाहून पवार यांनी डोक्याला हात मारून घेतला.
साडेतीन तास उशिराने दाखल
आमदार रोहित पवार हे रविवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले होते. पवार हे तब्बल साडेतीन तास उशिराने जळगावातील पक्ष कार्यालयात दाखल झाले. या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाची वेळ ही दुपारी ३ वाजताची होती. परंतु, ते उशिरा आल्याने कार्यकर्ते व पदाधिकारी ताटकळत बसले. सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास ते कार्यालयात दाखल झाले. तेव्हा कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला. काही युवा कार्यकर्ते थेट व्यासपीठाजवळ जाऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न करू लागले. अशात रेटारेटी होऊन प्रचंड गोंधळ उडाला. पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी अनेक जण थेट व्यासपीठाजवळ आल्याने गोंधळात भर पडली.
थेट भाषणाला केली सुरुवात
कार्यक्रमस्थळी गोंधळ उडाल्याचे पाहून रोहित पवार यांनी थेट माईकचा ताबा घेऊन भाषणाला सुरुवात केली. अवघ्या पाच मिनिटात त्यांनी भाषण आटोपले. त्यानंतर ते कार्यकर्त्यांना चुकवत कार्यालयाच्या मागच्या दरवाजाने बाहेर पडले.
अर्णब गोस्वामीच्या अटकेची भाजपने मागणी करावी
रोहित पवार म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राज्यभर युवा वर्गाच्या हाती सत्तेची सूत्रे गेली आहेत. यापुढे आपण सर्व जण एकत्र आलो तर पुढील निवडणुकांमध्ये निश्चितच चित्र बदलेल, असा विश्वास त्यांनी वर्तविला. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या माहितीची खातरजमा केल्याशिवाय ती पुढे पाठवू नये. काही विरोधक सोशल मीडियाच्या माध्यमातून संविधानाच्या विरोधात माहिती पाठवू शकतात. देशाच्या सुरक्षेला बाजूला ठेवून एखाद्या पत्रकाराला माहिती पुरवणे, ती पण तीन दिवस आधी देणे चुकीचे आहे. तो फक्त भाजपच्या बाजूने बोलत असेल म्हणून अशी माहिती देणे योग्य नाही. अशा प्रकारे केंद्र सरकारकडून आपल्या सर्वांची सुरक्षा धोक्यात येत असेल तर आपण सर्वांनी त्याच्यावर कारवाईची केंद्राकडे मागणी करायला हवी. भाजपने स्वतः अर्णब गोस्वामीच्या अटकेची मागणी करायला हवी, असे रोहित पवार यांनी म्हणाले.