विवाहितेची आत्महत्या, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST2021-06-02T04:14:22+5:302021-06-02T04:14:22+5:30
ब्राह्मण शेवगे येथील सविता हिने घराशेजारी राहणाऱ्या रवींद्र मच्छींद्र चव्हाण यांच्याशी तीन वर्षांपूर्वी आळंदी येथे विवाह केला होता. त्यानंतर ...

विवाहितेची आत्महत्या, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
ब्राह्मण शेवगे येथील सविता हिने घराशेजारी राहणाऱ्या रवींद्र मच्छींद्र चव्हाण यांच्याशी तीन वर्षांपूर्वी आळंदी येथे विवाह केला होता. त्यानंतर पंधरा दिवसांनी हे दाम्पत्य मेहुणबारे पोलीस ठाण्यात हजर झाले होते. त्यावेळी दोघांनी पोलीसांना आम्ही स्वखुशीने लग्न केल्याचे सांगितले. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी या दोघांचे रीतसर घरासमोर लग्न लावून दिले. लग्नानंतर दोघांचा संसार सुरळीत सुरू होता. लग्नानंतर एक-दोन महिने सविता हिस तिच्या सासरच्यांनी चांगले वागविले. नंतर मात्र सविता हिस मुलगा झाल्यानंतरही सासूकडून हुंडा कमी दिला, असे सांगत काही ना काही कारणांवरून टोमणे मारत व मानसिक छळ करत तसेच दोघांना सासूने वेगळे काढून दिले.
घर बांधण्यासाठी माहेरून २ लाख रुपये घेऊन ये. तसेच तुझ्या आईवडिलांना तुझ्या नवऱ्याच्या नावावर दोन एकर जमीन करायला सांगत सासू, जेठ व जेठाणी यांनी सविता हिचा शिवीगाळ करीत शारीरिक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून सविता हिने रविवार ३१ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र या आत्महत्येला मयत सविता हिची सासू, जेठ व जेठाणी हे जबाबदार असल्याची फिर्यादी आशाबाई मोरे यांनी दिल्यावरून सासू तुळसाबाई मच्छींद्र चव्हाण,जेठ समाधान मच्छींद्र चव्हाण व जेठाणी दिया समाधान चव्हाण यांच्या विरोधात भादंवि कलम ३०६, ४९८अ, ६०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.