मन्याड सुसाट, तर गिरणा एक्स्प्रेस थांबलेलीच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:20 IST2021-09-06T04:20:53+5:302021-09-06T04:20:53+5:30
फोटो चाळीसगाव : सतत हुलकावणी देत ओढ घेणाऱ्या पावसाने २० ऑगस्टनंतर दमदार पुनरागमन करीत चाळीसगाव परिसराला झोडपत सरासरीचे ...

मन्याड सुसाट, तर गिरणा एक्स्प्रेस थांबलेलीच !
फोटो
चाळीसगाव : सतत हुलकावणी देत ओढ घेणाऱ्या पावसाने २० ऑगस्टनंतर दमदार पुनरागमन करीत चाळीसगाव परिसराला झोडपत सरासरीचे शतक पूर्ण केले आहे. ३१ ऑगस्ट रोजी आलेल्या महापुराने मोठे नुकसान केले आहे. आभाळमाया बरसत असल्याने मन्याड सुसाट आहे. मात्र गिरणा एक्स्प्रेस थांबलेलीच आहे.
शनिवारी रात्रीपासूनही पावसाने छत्री उघडली असून, हा पाऊस कांदा व कडधान्ये पिकांना नख लावणारा ठरणार आहे. यामुळे शेतकरी काहीसे चिंताक्रांत झाले आहे. २३ ऑगस्ट रोजी मन्याडने शतकी सलामी देत यंदा हॅटट्रिक साधली. धरण क्षेत्रासह कळवण, सटाणा, मालेगाव तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कमी असल्याने गिरणा धरणाच्या जलसाठ्यात समाधानकारक वाढ झालेली नाही. धरणात सद्य:स्थितीत अवघा ४७ टक्के जलसाठा आहे. पिण्याच्या पाण्याची चिंता नसली तरी सिंचनाखालील शेती क्षेत्रासाठी गिरणा धरण ओव्हरफ्लो होणे आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे.
'गिरणा'माय निम्म्या जिल्ह्याची तहान भागवते उत्तर महाराष्ट्रातील महाकाय धरण म्हणून गिरणाची ओळख आहे. धरणाची साठवण क्षमता २१ हजार ५०० दलघफू असून, मालेगाव, चाळीसगावसह नांदगाव, दहिवाळ या पाणीपुरवठा योजनांसोबतच २५ गावांना धरणातून पाणीपुरवठा होतो. जळगाव जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील १५४ ग्रामपंचायतींनादेखील गिरणातून पाणीपुरवठा होतो.
1...गिरणा धरण भरण्यासाठी गेल्या काही वर्षांत सप्टेंबर महिना उजाडत आहे. २०१९ मध्ये गिरणाने २६ सप्टेंबर, तर गेल्यावर्षी १६ सप्टेंबर रोजी सेंच्युरी ठोकली होती. यावर्षी मात्र त्याची शतकी वाटचाल आस्तेकदम होत आहे.
2..मन्याड धरण ओव्हरफ्लो झाल्याने त्यांच्या सांडव्यातून एक हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 3..तालुक्यातील १४ मध्यम प्रकल्पांपैकी दहा धरणेही ओव्हरफ्लो झाले आहे.
गेले दोन दिवस पावसाने काहीअंशी विश्रांती घेतली होती. मात्र शनिवारी सायंकाळी त्याने पुन्हा पावसाने सुरू केली असून, रविवारी दिवसभरही त्याची हजेरी होती. यामुळे आठ ते नऊ हजार रुपये पायली दराने घेतलेल्या कांदा रोपांना बुरशी लागण्याची शक्यता आहे. कडधान्य पिकांसाठीही हा पाऊस मारक असल्याने बळीराजा काहीअंशी धास्तावला आहे.
चौकट
मका, कपाशीसाठी 'बल्ले...बल्ले' पावसाची संततधार कांदा, कडधान्याच्या मुळावर असली तरी फुल व कैऱ्या लागण्याच्या स्थितीत असणाऱ्या कपाशीसह तुरे निघू पाहणाऱ्या मका पिकांसाठी तारक ठरणार आहे. ओढ घेतलेल्या पावसासह ऑगस्ट हीटने माना टाकलेल्या कपाशी व मका पिकांच्या क्षेत्रासाठी हा पाऊस 'गुणकारी' ठरणार आहे.