जगणे तुझं, भोगणे तुझं, फक्त शब्द माझे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:55 IST2021-02-05T05:55:04+5:302021-02-05T05:55:04+5:30
जळगाव : ‘जे प्रसंग आपण सोसले, जो त्रास भोगला तो कुणाच्या वाट्याला येऊ नये हा ध्यास घेऊन अनाथांची आई ...

जगणे तुझं, भोगणे तुझं, फक्त शब्द माझे
जळगाव : ‘जे प्रसंग आपण सोसले, जो त्रास भोगला तो कुणाच्या वाट्याला येऊ नये हा ध्यास घेऊन अनाथांची आई झालेल्या समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर होणे हा खऱ्या अर्थाने अर्ध शतकाहून अधिक सेवाव्रताची दखल आहे, या पुरस्काराने आम्ही धन्य झालो...’, या भावना आहेत, सिंधुताई सपकाळ यांचे मानसपुत्र तथा ताईंचे जीवनकार्य ‘अनाथांची आई’ या पुस्तकाच्या माध्यमातून जगासमोर आणणारे जळगावातील लेखक डी.बी. महाजन यांचे. इतरांच्या आयुष्यातील निराशा दूर करण्यासाठी लिहिलेले पुस्तक आपण सिंधूताईंच्या संघर्षमयी जीवनाशिवाय लिहूच शकलो नसतो. त्यामुळे ‘जगणे तुझं, भोगणे तुझं, फक्त शब्द माझे, तू जगलीच नसती तर मी कसा लिहू शकलो असतो..’ या भावना सिंधुताईंच्या जीवनसंघर्षाचे दर्शन घडवितात, असे महाजन यांनी सिंधुताईंना पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. त्या पार्श्वभूमीवर या अनाथांच्या आईवर पुस्तक लिहिणारे त्यांचे मानसपूत्र, परिवहन महामंडळाच्या प्रशासकीय विभागातून निवृत्त झालेले डी.बी. महाजन यांनी सिंधुताईंचे जळगावशी व खान्देशशी असलेल्या नात्याला उजाळा दिला.
ताईंचा संघर्ष आणि समाजातील निराशा दूर करण्याचा ध्यास
डी.बी. महाजन हे १९९१पासून सिंधुताई सपकाळ यांच्यासोबत कार्य करीत आहेत. या दरम्यान त्यांनी राज्यभरात ताईंसोबत प्रवास केला व ताईंचे कार्य, त्यांचा संघर्ष जवळून पाहिला आहे. ताईंच्या या संघर्षाची गाथा इतरांसमोर जावी व काहीही नसताना जगता येऊ शकते, जगविता येऊ शकते हा संदेश देऊन समाजातील निराशा, आत्महत्या रोखणे यासाठी महाजन यांनी २०१५मध्ये ‘अनाथांची आई’ हे पुस्तक लिहिले. पुस्तक लिहिण्यामागचा आपला उद्देश साध्यही झाला असून हे पुस्तक वाचून अनेकांच्या जीवनातील निराशा दूर झाली व सिंधुताईंच्या कार्याचा वसाही अनेकांनी घेतल्याने आपण धन्य झालो असल्याची महाजन यांची भावना आहे.
पुरस्काराने भाकरी मिळत नाही, मात्र या पुरस्काराने मनस्वी आनंद
सिंधूताई सपकाळ यांनी पुरस्कारासाठी या कामाची सुरुवात केली नाही. उलट पुरस्काराने भाकरी मिळत नाही, त्यासाठी गावोगावी फिरावे लागते असे म्हणणाऱ्या सिंधूताईंच्या कार्याची आता दखल घेतली गेल्याने मानसपूत्रांना मनस्वी आनंद झाला आहे. तसे पाहता ताईंना आतापर्यंत ९०० पुरस्कार मिळाले आहे, मात्र पद्म पुरस्कार मिळावा, ही ताईंची नव्हे मात्र आमची अपेक्षा होती व आज ती पूर्ण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
आईच्या काळजातून उभ्या राहिलेल्या संस्थेला अर्पण
अनाथांची आई या पुस्तकाच्या १३ आवृत्त्या झाल्या आहेत. आतापर्यंत ६५ हजार प्रतिंची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे मराठीतील या पुस्तकाचे उर्दू, गुजराथी भाषेत भाषांतर झाले असून सध्या कानडी भाषेत भाषांतर सुरू आहे. एकट्या जळगावात अडीच लाख रुपयांचे हे पुस्तके विक्री झाले असून या अडीच लाखांसह एकाही पुस्तकाची रक्कम महाजन हे स्वत:साठी ठेवत नाही व ती पूर्ण रक्कम सिंधूताईंच्या संस्थेला मदत म्हणून देतात. कारण एका आईच्या श्रमातून, कष्टातून व आईच्या काळजातून या संस्था अनाथांसाठी उभ्या राहिल्याने त्यांना सर्वस्वी अर्पण केल्याचे महाजन यांचे म्हणणे आहे.
——————-
५० वर्षांच्या सेवाकार्याची आता दखल घेतली गेली असून माईंच्या सर्वच मानसपुत्राना याचा मनस्वी आनंद झाला आहे. माईंनी पुरस्कारासाठी काम केले नाही हे खरे आहे, मात्र त्यांच्या कार्याची ही पावती आहे, असे आम्ही मानतो.
- डी.बी. महाजन, सिंधुताई सपकाळ यांचे मानसपुत्र तथा लेखक