बालिकेच्या खूनप्रकरणी जन्मठेप
By Admin | Updated: October 8, 2014 11:45 IST2014-10-08T11:45:38+5:302014-10-08T11:45:38+5:30
नयना प्रल्हाद कोळी या बालिकेचा खून केल्या प्रकरणातील आरोपी जीवन उर्फ देवेंद्र नथू चालसे याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.बी. दात्ये यांनी जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

बालिकेच्या खूनप्रकरणी जन्मठेप
जळगाव : रावेर तालुक्यातील रणगाव रस्त्यावर शौचालयास गेलेल्या नयना प्रल्हाद कोळी (वय-९) या बालिकेचा खून केल्या प्रकरणातील आरोपी जीवन उर्फ देवेंद्र नथू चालसे (रा.फैजपूर, ता.यावल) याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.बी. दात्ये यांनी जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
रावेर तालुक्यातील रणगाव येथील सुनील संपत कोळी यांनी फिर्याद दिली आहे. ४ एप्रिल २0१0 रोजी फिर्यादीची मुलगी निकिता, पुतणी काजल व नयना प्रल्हाद कोळी या दुपारी दोन वाजेच्या सुमारास रणगाव रस्त्यावर शौचासाठी गेल्या होत्या. यादरम्यान आरोपी जीवन उर्फ देवेंद्र नथू चालसे हा याठिकाणी दुचाकीवरून आला होता. याठिकाणी थांबून त्याने या तिन्ही मुलींना हटकले होते. या वेळी एक मुलगी हसली होती. याचा राग आल्याने आरोपी जीवन याने निकिता हिला पकडले. मात्र तिने झटका मारून पळ काढला. त्यानंतर आरोपीने नयना हिच्या पोटात चाकूने सपासप वार केले. गंभीर जखमी झाल्याने नयनाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर दोन्ही मुली बस स्टॅण्डजवळ ओरडत आल्या. तेथे फिर्यादीला झालेला प्रकार सांगितल्यानंतर सर्व जण घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनला भादंवि कलम ३0२ प्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. आरोपीने रावेर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी वाय.एल. मेश्राम यांच्याकडे कबुली जबाब दिला होता. त्यात आरोपीने अमोल दीपक कोळपकर (रा.शिंदखेडा) याने आपल्याला फोन करून पत्नीबाबत अपशब्द बोलल्याचे सांगितले होते. त्यामुळे बेचैन होऊन आपल्याला दोन दिवस झोप लागली नाही. डोके शांत करण्यासाठी आपण रणगावकडून जात असताना ही घटना घडल्याचे त्याने सांगितले होते. या खटल्याचे कामकाज न्या.एम.बी. दात्ये यांच्या कोर्टात झाले. सरकारी वकील टी.डी. पाटील यांनी सात साक्षीदार तपासले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आरोपी जीवन चालसे याला जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
दोन खून दोन वेळा जन्मठेप
आरोपी हा नयनाचा खून करून शिंदखेडा येथे गेला होता. तेथे त्याने अमोल दीपक कोळपकर याचा खून केला होता. त्या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. नयना कोळी या बालिकेच्या खून प्रकरणात न्यायालयाने त्याला पुन्हा जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.