लोकशाही आणखी बळकट करू या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:22 IST2021-08-17T04:22:22+5:302021-08-17T04:22:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भारताच्या स्वातंत्र्याबरोबर जगातील अनेक देशांना स्वातंत्र्य मिळाले. या देशांनी सुरुवातीला लोकशाहीचा स्वीकार केला. कालांतराने ...

लोकशाही आणखी बळकट करू या...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भारताच्या स्वातंत्र्याबरोबर जगातील अनेक देशांना स्वातंत्र्य मिळाले. या देशांनी सुरुवातीला लोकशाहीचा स्वीकार केला. कालांतराने या देशांना लोकशाहीची मूल्य जोपासता आली नाहीत. ती मूल्ये आपल्या भारत देशातील प्रत्येक नागरिकाने जोपासली आहेत. त्यामुळेच भारतासारखा विशालकाय देश एकसंघ राहू शकला. ही सर्व कमाल आपल्या लोकशाहीची आहे. म्हणूनच आपण आजपासून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवास सुरुवात करून लोकशाहीला आणखी बळकट करूया, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या ७४व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रंजना पाटील, महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, नेहा भोसले, आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाने ओढ दिली आहे. माझा बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. जून, जुलैत म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, ऑगस्टच्या १५ दिवसांनंतरही पाऊस रुसलाच आहे. असेच चित्र राहिले, तर नैसर्गिक आपत्ती ओढावण्याची चिन्हे आहेत. मात्र, शेतकरी, नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. सरकार शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि राहील अशी ग्वाही गुलाबराव पाटील यांनी दिली.