दहा महिन्यांनंतर स्कूल चले हम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:58 IST2021-02-05T05:58:30+5:302021-02-05T05:58:30+5:30
जळगाव : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा बुधवारपासून सुरू करण्यास राज्य शासनाने हिरवा ...

दहा महिन्यांनंतर स्कूल चले हम !
जळगाव : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा बुधवारपासून सुरू करण्यास राज्य शासनाने हिरवा कंदील दाखविला होता. त्यानुसार कोरोना नियमांचे पालन करत जळगाव जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा बुधवारपासून सुरू झाल्या. हात सॅनिटाईज करून व तापमान मोजूनच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाऊन स्वागत करण्यात आले. पहिल्या दिवशी बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांची चांगली उपस्थिती दिसून आली.
जळगाव जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या १९२६ शाळा असून त्यामध्ये सुमारे ३ लाख १० हजार विद्यार्थी आहेत. तब्बल दहा महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर बुधवारी इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा उघडल्या. शहरातील नंदिनीबाई विद्यालय, प्रगती विद्यालय यासह इतर शाळांमध्ये सकाळी ७.३० वाजता विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. त्याआधी प्रवेशद्वारावर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे हात सॅनिटाईज केले. नंतर तापमान व ऑक्सिजन मोजून वर्गात प्रवेश दिला. सामाजिक अंतर राहावे, यासाठी खुणासुध्दा शालेय परिसरात आखण्यात आल्या होत्या.
कुठे तुरळक तर कुठे चांगली उपस्थिती
लोकमत प्रतिनिधीने शहरातील काही शाळांना भेटी देऊन पाहणी केली. त्यात काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची तुरळक उपस्थिती होती़ मात्र, ए.टी.झांबरे, नंदिनीबाई तसेच कन्या, चौबे मनपा व इतर शाळांमध्ये पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क बंधनकारक केले होते. तर वर्गातही सामाजिक अंतर ठेवून बसविण्यात येत होते. गणित, इंग्रजी, विज्ञान यासह इतर काही विषयांच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करण्यात आली. दुपारी तीन वाजेपर्यंत शाळा सुरू होती.
गप्पा रंगल्या..
दीर्घ कालावधीनंतर वर्गातील मित्र-मैत्रिणी भेटल्यानंतर त्यांच्या चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी पालकांनीसुध्दा हजेरी लावली होती. त्यावेळी संमतीपत्रसुध्दा भरून घेतले जात होते. ए.टी. झांबरे विद्यालयाच्या बाहेर विद्यार्थ्यांची चांगलीच गर्दी झाली होती. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व सुविधा शाळांकडून उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. खूप दिवसांनी मित्र-मैत्रिणी तसेच शिक्षक भेटल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.
शिक्षण विभागाच्या पथकाकडून पाहणी
प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या पथकाकडून जळगाव तालुक्यातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गाची पाहणी करण्यात आली. तसेच विद्यार्थी उपस्थिती तपासून आवश्यक सूचना त्यांनी केल्या.