दोनच दिवसांत ‘वाघूर’च्या साठ्यात आठ टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:20 IST2021-09-07T04:20:46+5:302021-09-07T04:20:46+5:30

जळगाव : पावसाळ्याच्या शेवटचा महिना उजाडला त्यावेळी जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमधील एकूण जलसाठ्याने पन्नाशी ओलांडली असून, सोमवारी (दि. ६) हा ...

In just two days, Waghur's stock increased by eight per cent | दोनच दिवसांत ‘वाघूर’च्या साठ्यात आठ टक्क्यांनी वाढ

दोनच दिवसांत ‘वाघूर’च्या साठ्यात आठ टक्क्यांनी वाढ

जळगाव : पावसाळ्याच्या शेवटचा महिना उजाडला त्यावेळी जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमधील एकूण जलसाठ्याने पन्नाशी ओलांडली असून, सोमवारी (दि. ६) हा साठा ५१.९० टक्क्यांवर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे पावसाळा सुरू झाल्यापासून घट होत गेलेल्या वाघूर धरणसाठ्यातही गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे वाढ होऊन धरणसाठा ७३.६० टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे शनिवारी मध्यरात्रीपासून झालेल्या जोरदार पावसामुळे वाघूर धरण साठ्यात दोनच दिवसात ७.५६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गिरणा धरणसाठाही ४७.७७ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, ५ सप्टेंबर रोजी ५५ टक्क्यांवर असलेले तोंडापूर धरण एकाच दिवसात ९३.४१ टक्क्यांवर पोहोचले आहे.

यंदा सलग पाऊस नसल्याने मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये किरकोळ चढ-उतार होत गेला. जून महिन्याच्या सुरुवातीला प्रकल्पांमध्ये ३२.७३ टक्के जलसाठा होता. तो ७ ऑगस्टपर्यंत केवळ ३६.०६ टक्क्यांवर पोहोचला. दोन महिन्यांत केवळ ३.३३ टक्के वाढ होऊ शकलेल्या जलसाठ्यात मात्र आता ७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरदरम्यान थेट १५.८४ टक्क्यांनी वाढ होऊन जिल्ह्यातील एकूण जलसाठा ५१.९० टक्क्यांवर पोहोचला आहे.

पाच दिवसांत ‘वाघूर’मध्ये ११ टक्क्यांहून अधिक वाढ

जळगाव व जामनेर तालुक्यांची तहान भागविणाऱ्या वाघूर धरण साठ्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर वाढ होण्याऐवजी उलट घट होत गेली होती. त्यामुळे ६५.०८ टक्क्यांवरून धरणसाठा ७ ऑगस्टपर्यंत ६२.१७ टक्क्यांवर आला होता. मात्र, गेल्या पाच दिवसांतच या धरणसाठ्यात ११.३४ टक्क्यांनी वाढ झाली व धरणसाठा ७३.६० टक्क्यांवर पोहोचला आहे. वाघूर धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने धरणसाठ्यात चांगली आवक सुरू झाली आहे. १ सप्टेंबर रोजी या धरणात ६२.६६ टक्के जलसाठा होता तो दररोज वाढत गेला व आता ७० टक्क्यांच्या पुढे पोहोचला आहे. यंदा ७३.६० टक्क्यांपर्यंत वाघूर धरणाचा साठा पोहोचला असला तरी गेल्या वर्षी ५ सप्टेंबर रोजी हे धरण १०० टक्के भरले होते. यंदा मात्र पावसाळ्याचा शेवटचा महिना उजाडला तरी ते २७ टक्क्यांनी खालीच आहे. दोन दिवसांतील मोठी वाढ पाहता यात आणखी चांगली भर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: In just two days, Waghur's stock increased by eight per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.