अवकाळीमुळे ज्वारी, गहू आडवा

By Admin | Updated: February 12, 2015 13:32 IST2015-02-12T13:32:41+5:302015-02-12T13:32:41+5:30

अवकाळी पावसामुळे गेल्या दोन महिन्यात गहू, ज्वारी, कापूस व इतर पिकांना तिनदा फटका बसला आहे. मंगळवारी झालेल्या पावसामुळे ज्वारी व गहू आडवा झाला आहे.

Jowar, wheat transit | अवकाळीमुळे ज्वारी, गहू आडवा

अवकाळीमुळे ज्वारी, गहू आडवा

जळगाव : अवकाळी पावसामुळे गेल्या दोन महिन्यात गहू, ज्वारी, कापूस व इतर पिकांना तिनदा फटका बसला आहे. मंगळवारी झालेल्या पावसामुळे ज्वारी व गहू आडवा झाला आहे. 
या दोन्ही पिकांचे ३0 ते ३५ टक्के नुकसान होण्याची भीती आहे. तर हरभर्‍यामध्ये घाटेअळी, तुडतुडे पडतील. तर कापसाची बोंडे काळवंडली आहेत. कमी भावात कापूस विक्री करण्याची वेळ आलेले कापूस उत्पादक पुन्हा कोंडीत सापडले आहेत. बाजारपेठेतील चढउतार आणि अवकाळी पाऊस असा दुहेरी मार कापूस उत्पादक व इतर पिके घेणार्‍या शेतकर्‍यांना बसला आहे. 
कापूस भिजला
जिल्हाभरात चार लाख ६२ हजार हेक्टरवर कापूस आहे. त्यात सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्र पूर्वहंगामी कापसाखाली आहे. कोरडवाहू कापसाची तर पावसाच्या लहरीपणामुळे आधीच बिकट अवस्था झाली आहे. अशातच पूर्वहंगामी किंवा बागायती कापसाकडून मोठय़ा अपेक्षा होत्या. पण अवकाळी पावसामुळे बागायती कापसातील बोंडे भिजून काळवंडली असून, कापूस उत्पादक आर्थिक कोंडीत सापडले आहेत. अशात अवकाळी पाऊस पुन्हा पुन्हा झोडपत आहे. 
गहू, ज्वारी लोळले
सुसाट वारा आणि पावसाचा तडाखा यामुळे गहू व ज्वारी (दादर) ही पिके लोळली आहेत. गहू आडवा झाल्याने दाणे बारीक पडतील. माती व ओलाव्यामुळे दाणे सडतील. कांडी खराब होऊन चाराही हवा तसा मिळणार नाही. ज्वारीला कणसे लागली आहे. ती आडवी झाल्याने कणसांना माती लागेल. दाणे परिपक्व होणार नाहीत. दाणे बारीक पडून काळवंडतील. त्यांचा दर्जा तर खराब होईल. ज्वारी व गव्हाखालील १७ हजार हेक्टर क्षेत्राला फटका बसल्याचा कृषि विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. 
हरभर्‍यावर रोगराई
यंदा हरभर्‍याचे क्षेत्र थंडी व ओलावा यामुळे नंतर वाढले. ते ३७ हजार हेक्टरपर्यंत गेले. अनेक भागात हरभर्‍याला घाटे लागले आहेत. तर काही भागात हरभरा फुलोर्‍यावर आले. परंतु पावसामुळे घाटेअळी फोफावेल. दाणे अर्धवट असणे, फुले गळणे अशा समस्या घाटेअळीमुळे निर्माण होणार आहेत. कृषि विभागाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. नुकसानीचा अहवाल आठवडाभरात तयार होईल, अशी माहिती कृषि उपसंचालक पी.के.पाटील यांनी दिली. 
एरंडोल तालुक्यात ३७२ घरे अंशत: पडली आणि पाचोरा तालुक्यात दोन जण जखमी झाले.
धान्य भिजले
बाजार समितीमध्ये परंतु जुने पोते, गोण्या काही दुकानांसमोर झाकून ठेवल्या होत्या. त्यांचे नुकसान झाले. त्या दुपारी वाळविल्या जात होत्या. आवक नसल्याने शेतकर्‍याच्या धान्याचे कुठलेही मोठे नुकसान बाजार समितीमध्ये झालेले नसल्याचे आडतदार संजय शहा यांनी सांगितले.

--------------

 बाजार समितीमध्ये भिजलेले धान्य बुधवारी वाळविले जात होते. बाजार समितीतही नुकसान कापूस खरेदी केंद्रांवर १५ ट्रॅक्टर कापूस भिजला
शहरालगतच्या आव्हाणे येथे भारतीय कापूस महामंडळातर्फे सुरू करण्यात आलेल्या कापूस खरेदी केंद्रावर अनेक शेतकर्‍यांनी ट्रॅक्टर व इतर वाहनांमध्ये कापूस विक्रीसाठी मंगळवारी दुपारी आणला होता.सायंकाळी केंद्र बंद होईपर्यंत अनेक शेतकर्‍यांचा कापूस विक्री होऊ शकला नाही. अशातच रात्री उशीरा जोरदार पाऊस सुरू झाल्याने या वाहनांमधील कापूस भिजला. कापसाला कनाटने झाकले होते. परंतु जीर्ण कनाट छिद्रे व पाणी रोखू न शकणारे असल्याने पाणी कापसात शिरले. जवळपास १५ ट्रॅक्टरमधील कापूस भिजला. शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. केंद्रात खरेदी केलेल्या कापसावर ताडपत्री टाकलेली असल्याने नुकसान झाले नाही. 

Web Title: Jowar, wheat transit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.