जळगावच्या अर्चित पाटीलला ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:55 IST2021-02-05T05:55:12+5:302021-02-05T05:55:12+5:30
जळगाव : रक्तस्त्रावाची तंतोतंत मोजणी, लवकर निदान आणि उपचार शक्य होण्यासाठी उपयोगी ठरलेल्या पीपीएच कपची निर्मिती करणाऱ्या जळगावातील अर्चित ...

जळगावच्या अर्चित पाटीलला ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार’
जळगाव : रक्तस्त्रावाची तंतोतंत मोजणी, लवकर निदान आणि उपचार शक्य होण्यासाठी उपयोगी ठरलेल्या पीपीएच कपची निर्मिती करणाऱ्या जळगावातील अर्चित राहुल पाटील या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याची पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड झाली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला झालेल्या ऑनलाइन सोहळ्यात जळगावात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते अर्चितला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
काय पीपीएच कप?
जगभरात प्रत्येक दर चार मिनिटाला एका मातेचा प्रसूतीनंतर अतिरक्तस्त्रावामुळे मृत्यू होतो. पीपीएच कपमुळे रक्तस्त्रावाची तंतोतंत मोजणी, लवकर निदान आणि उपचार शक्य होते. या यंत्रामुळे किती रक्तस्त्राव झाला हे सारखे-सारखे बघावे लागत नाही, ओलावा नसतो, निर्जंतुक करून १० ते १५ वर्षे हे यंत्र वापरू शकतो, सॅनिटरी पॅडचा वापरही टळतो आणि पर्यायाने पर्यावरणपूरकही हे सयंत्र आहे. भविष्यात हे सयंत्र महिला आरोग्यासाठी वरदान ठरणारे आहे. या सयंत्राचा पेटंट मिळण्यासाठीही नोंद झाली आहे. या संशोधनाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली.
जळगावसाठी गौरवास्पद सन्मान
अर्चितच्या या संशोधनाबद्दल यापूर्वीही त्याची वेगवेगळ्या पातळीवर दखल घेतली गेली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार आणि राष्ट्रीय नवीनता संस्था, राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद, महाराष्ट्र यांच्या वतीने गेल्या वर्षी अमरावती येथे आयोजित नवव्या राज्यस्तरीय इंस्पायर अवॉर्ड प्रदर्शन पीपीएच कप पोहोचला होता. या सयंत्रची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्थरावरील प्रदर्शनासाठीही निवड झाली होती. त्यानंतर, आता थेट हे सयंत्र तयार करणाऱ्या अर्चितची ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारा’साठी निवड झाली. देशातील एकूण ३१ मुलांना हा पुरस्कार घोषित झाला. पुरस्कार वितरणाच्या वेळी अर्चितचे वडील डॉ.राहुल पाटील, आई डॉ.अर्चना पाटील हेही उपस्थित होते.
आई-वडिलांसोबत रुग्णालयात थांबल्याने आली संकल्पना
अर्चित हा जळगावातील काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलचा इयत्ता नववीचा विद्यार्थी आहे. आई-वडील डॉक्टर असल्याने, तो त्यांच्यासोबत रुग्णालयात आल्यानंतर, तेथील मातामृत्यूचे प्रमाण पाहून याविषयी त्याने आई-वडिलांना विचारले. त्यावेळी त्यांनी प्रसूतिपश्चात अतिरक्तस्त्रावामुळे महिलांचा मृत्यू होतो व तो प्रयत्न करूनही रोखता येत नसल्याचे सांगितले. त्याच वेळी अर्चितने यावर संशोधन करण्याचे ठरविले व तो आठवीत असतानाच त्याने हा पीपीएच कप तयार केला.
राष्ट्रसेवेसाठी संशोधन करण्याचा ध्यास
अर्चितला जगातील सर्वोष्कृष्ठ संशोधन संस्थेत संशोधन करायचे असून, याद्वारे देश आणि मानव सेवा घडू शकेल, तसेच सकात्मक बदल घडविण्याचाही त्याचा मानस असून यातून आपल्या देशाला, आई-वडिलांना गर्व वाटावा असे काम करायचे असल्याचे त्याने सांगितले.