जळगावात आठवडाभरात सारीचे मृत्यू निम्म्याने घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:16 IST2021-05-26T04:16:21+5:302021-05-26T04:16:21+5:30
आनंद सुरवाडे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना काळातील निर्बंध व तीन नियम यामुळे कोरोनाच नव्हे तर अन्य विषाणूजन्य ...

जळगावात आठवडाभरात सारीचे मृत्यू निम्म्याने घटले
आनंद सुरवाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना काळातील निर्बंध व तीन नियम यामुळे कोरोनाच नव्हे तर अन्य विषाणूजन्य आजारही नियंत्रणात येत आहेत. कोरोना घटत असताना सारी या आजाराचे मृत्यूही घटले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सारीच्या मृत्यूंमध्ये निम्म्याने घट झाली आहे. १७ ते २४ मे दरम्यान जिल्ह्यात ३६ मृत्यू नोंदविण्यात आले आहेत.
दुसऱ्या लाटेच्या मध्यंतरी कोरोनापेक्षा सारीने अधिक मृत्यू होत असल्याचे समोर आले होते. सारी अर्थात सिव्हीअर ॲक्युट रेस्पीरेटरी इन्फेक्शन या आजाराचे पहिल्या लाटेतही मृत्यू होत होते. मात्र, त्यांचे प्रमाण नियंत्रणात होते. दुसऱ्या लाटेत मात्र कोरोनाचा जोर असताना मृत्यूंचे प्रमाण पहिल्या लाटेपेक्षा अधिक वाढलेले होते. यात सारी या आजारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले होेते. या मृत्यूची नोंद, सारी, कोरोना संशयित किंवा न्यूमोनिया अशा पातळ्यांवर शासकीय यंत्रणेत केली जात आहे. मध्यंतरी दिवसाला २० ते २२ रुग्णांचा मृत्यू हा सारी, कोरोना, संशयित, न्यूमोनिया यामुळे हाेत होता.
नंतर सुरू झाली नोंद
कोविडमध्ये समोर येणारी मृतांची संख्या व प्रत्यक्षात होणाऱ्या अंत्यसंस्कारांची संख्या यात प्रचंड तफावत समोर आल्यानंतर यात अधिकांश मृत्यू हे कोरोना संशयित रुग्णांचे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यात सारीची संख्या अधिक होती. सारी व कोरोनात श्वास घ्यायला त्रास होणे हे लक्षण सारखे असल्याने याची नोंद कोरोना संशयित म्हणूनही होत होती. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासनाकडून सारी, कोरोना संशयित रुग्णांची शासकीय अहवाला नोंद करण्यात येत आहे.
आठवडाभरात ३६ मृत्यू
१७ मे ६
१८ मे ६
१९ मे ६
२० मे ४
२१ मे ४
२२ मे ५
२३ मे ३
२४ मे २
मागील आठवड्यात ६७ मृत्यू
९ मे ११
१० मे ९
११ मे ९
१२ मे ८
१३ मे ९
१४ मे ७
१५ मे ८
१६ मे ७
कोट फ्ल्यू
सारी हा फ्ल्यूचा एक प्रकार आहे. त्यामुळे मास्क परिधान करणे, हात वारंवार धुणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे या नियमांमुळे आपण केवळ कोरोनाच नाही तर अन्य विषाणूजन्य आजारांना दूर ठेवू शकतो. त्यामुळे सारीचे मृत्यू व रुग्णही कमी येत आहेत. यासह कॉलरा, टायफाइड, टीबी अशा आजारांचा प्रसारही कमी होणार आहे. त्यामुळे आता मास्क, हात धुणे व डिस्टन्सिंग पाळणे ही नागरिकांनी जीवनशैली बनवून घ्यावी, त्यामुळे कोरोना, सारी तर दूर राहीलच, मात्र इतर आजारांपासूनही तुमचे संरक्षण होणार आहे.
- डॉ. किशोर इंगोले, विभागप्रमुख, सूक्ष्म जीवशास्त्र विभाग