हक्काच्या घराबाबत जळगाव जिल्हा अग्रेसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:42 IST2017-08-05T00:41:09+5:302017-08-05T00:42:13+5:30
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा : ३७ हजार ८८५ लाभार्थींना घरकुलांचा लाभ

हक्काच्या घराबाबत जळगाव जिल्हा अग्रेसर
किशोर पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अपूर्ण असलेल्या ४१ हजार ९७८ घरकुलांपैकी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने ३७ हजार ८८५ जणांना घरकुलांचा लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेत ९० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या कामगिरीमुळे घरकुलांच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये जळगाव जिल्हा राज्यात अव्वल ठरला असल्याची माहिती शुक्रवारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विक्रांत बगाडे यांनी दिली.
या योजनेतंर्गत २००५-०६ या आर्थिक वर्षात ४१ हजार ९७८ घरकुले पूर्ण करण्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेसमोर आव्हान होते़ त्यानंतर गेल्या दहा वर्षात विभागाने जिल्ह्यातील ३७ हजार ८८५ जणांचे घराचे स्वप्न साकार केले आहे़
यादरम्यान प्रत्येक लाभार्थींच्या थेट खात्यावर तीन टप्प्यात अनुदान जमा झाले़ घरकुले पूर्ण होईपर्यंत विभागाने पाठपुरावा केला़ यात प्रत्येक घरकुलात शौचालयाबाबतही विशेष काळजी घेण्यात आली असल्याचे बगाडे यांनी विशेषत्वाने नमूद केले.
आर्थिक जातीनिहाय सर्वेक्षणातील १२ हजार ७५७ जणांना घरकुले
अपूर्ण घरकुलांची उद्दिष्टपूर्ती करत असताना इतर योजनेतील घरकूल उद्दिष्टपूर्तीकडेही लक्ष देण्यात आले. २०११ मध्ये शासनाने केलेल्या सामाजिक आर्थिक जातनिहाय सर्वेक्षणनुसार ८३ हजार ४९४ लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांसाठी पात्र ठरले होते़
२०१६-१७ या आर्थिक वर्षात त्यापैकी १२ हजार ७५७ जणांना विभागाने लाभ मिळवून घरकुले पूर्ण केली आहे़ तसेच गेल्या वर्षी शबरी , रमाई तसेच पारधी या तिन्ही योजनेतील उद्दिष्टांनुसार एकूण तीन हजार १६८ लाभार्र्थींचे घरकुलांचे स्वप्न पूर्ण केले आहे़