जीवावर उदार होत रात्री शेतीसाठी सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 06:40 PM2020-11-29T18:40:24+5:302020-11-29T18:43:25+5:30

अक्षरशः जिवावर उदार होऊन, जीव मुठीत धरुन शेतकरी रात्री शेतावर जातो खरा पण तो सकाळी घरी येईपर्यंत घरच्यांचा जीव टांगणीला लागलेला असतो.

Irrigation for nocturnal farming | जीवावर उदार होत रात्री शेतीसाठी सिंचन

जीवावर उदार होत रात्री शेतीसाठी सिंचन

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांना फटकापिकांना पाणी देण्यासाठी करावी लागते कसरत
जय हिरेखेडगाव, ता.भडगाव : तालुक्यातील सातही वीज उपकेंद्रातून शेतीसाठी रात्री दहाला आठवड्यात चार व तीन दिवस-रात्री विभागून शेतीसाठी वीजपुरवठा करण्यात येतो. यामुळे प्रत्येक शेतक-यास रात्री सिंचन करणे क्रमप्राप्त ठरते. अक्षरशः जिवावर उदार होऊन, जीव मुठीत धरुन शेतकरी रात्री शेतावर जातो खरा पण तो सकाळी घरी येईपर्यंत घरच्यांचा जीव टांगणीला लागलेला असतो. साप-विंचू आदी सरपटणारे प्राणी, बिबट्या, रानडुक्कर, शिकारी कुत्रे यामुळे उभ्या पिकात अंधारी रात्र वै-याचीच ठरते. याचबरोबर विजवाहिनी, ट्रान्सफार्मरवर फॉल्ट होणे, वीजपंप, स्टार्टर, मेनस्वीचवर काम करणे हे सर्व जिवावर उदार होऊनच करावे लागते. नजीकच्या काळात तालुक्यात एखादी अघटित घटना घडली नसली तरी यामागे रात्री सिंचनासाठी जाणा-यांना सर्पदंश, रानडुकराचा हल्ला, वीज शॉक बसणे आदी जिवावर बेतणारे प्रसंग घडले आहेत. यावर्षी चांगला पावसाळा झाल्याने विहिरींना फुल्ल पाणी आहे.साहजिकच रब्बी हंगाम तालुक्यात आठ ते दहा हजार हेक्टरवर घेतला जात आहे याशिवाय गिरणाकाठ असल्याने ऊस, केळी, लिंबू, पेरू, मोसंबी बागायतदेखील इतकीच आहे. यातील केळी व लिंबू फळबागायतीला ठिबक संचातुन पाणी दिले जाते. स्वयंचलित यंत्रणा बसविल्याने रात्री ठिबक संच सुरू-बंद या यंत्रणेद्वारे होतात. येथे धोका कमी आहे. मात्र सार्वत्रिक क्षेत्रावर वाफे, सारे, सरी व मोकाट पध्दतीने पाणी दिले जाते.रब्बीत गहू, हरभरा, मका, ज्वारी या पिकांना सिंचनासाठी रात्रीचा दिवस करावाच लागतो. रात्री सिंचनास शेतमजूर मिळत नाही. एकत्र कुटुंब पध्दत बुडाल्याने एकट्या शेतक-यांस शेतावर जाणे भाग पडते. तालुक्यात साधारणपणे आठवड्यातून चार किंवा तीन दिवस रात्री नऊ-दहा वाजता शेतीसाठी वीजपुरवठा सुरू होतो. एवढ्या रात्री उठून दुरवरच्या शेतात जाणे भाग पडते.नदी,नाले,खराब रस्ते हे दिव्य पार करुन वीजपंप सुरू होईल याची श्वाश्वती नसते. सिंचन आटोपण्यासाठी मग बिघाड शोधण्यासाठी ट्रान्सफार्मर, मेनस्विच, वीजपंप यात एवढ्या रात्री बोट घालणे आलेच कारण वायरमन वा वीजतंत्री भलत्या वेळेस नसतो. रब्बी म्हणजे हिवाळा आलाच. गारठणा-या थंडीत पाणी, चिखल यात पाय रोवून उभे रहावे लागते. या दिवसात दव पडत असल्याने उभ्या पिकात शेतकरी आंघोळ घातल्यागत नखाशिखांत भिजतो. अशात सात-आठ तास उभे राहणे आलेच.दिवसाचे त्रांगडेतालुक्यात गिरड, आमडदे, वडजी, लोण, कजगाव, कोळगाव येथे वीज उपकेंद्र आहेत. त्यामानाने तालुक्यात १३२ केव्ही सबस्टेशन नसल्याने तालुका विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाही. पाचोरा, पारोळा व चाळीसगाव या तीन दिशांना असलेल्या तीन तालुक्यातील १३२ केव्ही सबस्टेशनवरवरील वीज उपकेंद्र अवलंबून आहेत. वीजवाहिनीचे अंतर, फॉल्ट, कमी दाब या कारणाने व वरील सर्वच सबस्टेशन ओव्हरलोड असल्याने दिवसा शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा मिळणे रामभरोसे असते. यामुळे रात्रीचे सिंचन शेतक-यांच्या पाचवीलाच पुजले आहे. युद्ध आघाडीवर जाणाऱ्या सैनिकासमच जीणे जंगलाच्या सीमेवर तालुक्याचे असलेले शेतशिवार, गिरणानदीचे कालसर्पासम भासणारे खोरे यामुळे बिबट्या, तडस, लाडंगे, रानडुकरे याशिवाय सिंचनासाठी शेतात फिरताना पावलापरत सर्प, विंचवाची भीती असतेच. वृद्ध आई-वडील वा एकटी-दुकटी महिला, आजारी वा रक्तदाबाचा विकार असलेले शेतकरी रात्री सिंचन करू शकत नाही. घरातील कर्ता पुरुष शेतावर जाणे म्हणजे वरील संकटामुळे युध्दावर लढण्यासाठी जाणा-या सैनिकासमच स्थिती असते. यामुळे सहा तास का असेना दिवसाच पूर्ण दाबाने, सुरळीत वीजपुरवठा शेतीसाठी मिळावयास हवा.-योगेश माळी, शेतकरी सौरऊर्जेवरील वीजउपकेंद्र हाच पर्यायशहरी भागात कारखानदारी, व्यावसायिक यामुळे दिवसा सर्वच विजेची मागणी प्रचंड असते. रात्री ग्रामीण भागात आठनंतर घरगुती व व्यावसायिक वापरात येणारी वीज मागणी घटते त्यामुळे पूर्ण क्षमतेने वीजदाब मिळून वीजपंप सुरळीत चालतात. दिवसा शेतक-यांना वीजपुरवठा द्यावयाचा ठरवल्यास सबस्टेशनमधील ट्रान्सफार्मर आदी सर्वच यंत्रणा दुप्पट करावी लागेल. नाही तर सबस्टेशन ओव्हरलोड होऊन सिस्टीम ढेपाळण्याची स्थिती निर्माण होईल. शासनाने मागे जाहीर केल्यानुसार येत्या तीन वर्षात सौरऊर्जेवर आधारीत स्वतंत्र वीजउपकेंद्र झाल्यावरच शेतक-यांना शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करणे शक्य होईल, असे महावितरणाच्या एका अधिका-याने यावर आपले मत मांडले.

Web Title: Irrigation for nocturnal farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.