चांदीच्या भावात दीड हजारांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:54 IST2021-02-05T05:54:50+5:302021-02-05T05:54:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात घसरण होत असताना चांदीच्या भावात ...

An increase of one and a half thousand in the price of silver | चांदीच्या भावात दीड हजारांची वाढ

चांदीच्या भावात दीड हजारांची वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात घसरण होत असताना चांदीच्या भावात मात्र वाढ होत आहे. याही अर्थसंकल्पात सुवर्ण व्यावसायिकांच्या पदरी निराशा पडते की काय, या शक्यतेमुळे भाववाढ होत असल्याचे सांगितले जात आहे. या भाववाढीत शनिवारी चांदीच्या भावात एक हजार ५०० रुपयांनी वाढ होऊन ती ७१ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली.

गेल्या १० दिवसांपासून सोने - चांदीच्या भावात फारसा चढ-उतार नव्हता. सोने २०० ते ३०० रुपये, तर चांदीचे भाव साधारण ५०० रुपयांपर्यंत कमी-अधिक होत होते. मात्र, केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याचा दिवस जसजसा जवळ येत आहे तसतसा चांदीचा भाव वाढत आहे. गेल्या अर्थसंकल्पात सुवर्ण व्यवसायासाठी कोणतीच घोषणा नव्हती. याही अर्थसंकल्पात या व्यवसायासाठी काही घोषणा न झाल्यास सोने-चांदीच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आयात शुल्काचा प्रश्न कायम असल्याने हे शुल्क यंदा कमी होण्याची अपेक्षा आहे. मात्र, तसे न झाल्यास हा बोजा कायम राहणार आहे. तसेच या अर्थसंकल्पात उद्योग क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा झाल्यास शेअर बाजारात कंपन्यांचे शेअर वधारून शेअर बाजाराला उसळी मिळू शकते व सोने-चांदीचे भाव कमी होण्याची शक्यता आहे, असे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे. मात्र, यासाठी सुवर्ण व्यवसायासाठी घोषणा होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, हा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच तीन दिवसांपासून चांदीच्या भावात वाढ होत आहे. यामध्ये २७ जानेवारी रोजी ६७ हजार रुपये प्रतिकिलोवर असलेल्या चांदीच्या भावात २८ रोजी एक हजार रुपयांनी वाढ होऊन ती ६८ हजारांवर पोहोचली. त्यानंतर २९ रोजी पुन्हा एक हजार ५०० रुपयांनी वाढ झाली व चांदी ६९ हजार ५०० रुपयांवर पोहोचली. शनिवार, ३० जानेवारी रोजी पुन्हा एक हजार ५०० रुपयांनी वाढ होऊन चांदी ७० हजारांच्या पुढे जात ७१ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली.

सोन्याच्या भावात शनिवार, ३० रोजी ४०० रुपयांनी घसरण झाली. मात्र, तीन दिवसांपासून त्यातही वाढ होत असल्याचे चित्र होते. २८ रोजी ३०० रुपयांनी वाढ होऊन सोने ५० हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. त्यानंतर २९ रोजी पुन्हा ३०० रुपयांनी वाढ होऊन ते ५० हजार ५०० रुपयांवर पोहोचले. दोन दिवसांच्या वाढीनंतर मात्र सोन्यात ३० रोजी ४०० रुपयांनी घसरण झाली व ते ५० हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर आले.

————————-

दोन दिवसांवर आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर ही भाववाढ होत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही अर्थसंकल्पात सुवर्ण व्यवसायासाठी काही घोषणा न झाल्यास आणखी भाववाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, शेअर बाजार वधारल्यास सोने-चांदीचे भाव कमी होऊ शकतात.

- स्वरुप लुंकड, सचिव, जळगाव सराफ बाजार असोसिएशन

Web Title: An increase of one and a half thousand in the price of silver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.