कहर...कोरोना थेट तीनशे पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:25 IST2021-02-23T04:25:04+5:302021-02-23T04:25:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाने सलग दुसऱ्या दिवशी चार महिन्यातील नवा उच्चांक नोंदवित कहर केला आहे. जिल्ह्यात ३१९ ...

कहर...कोरोना थेट तीनशे पार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाने सलग दुसऱ्या दिवशी चार महिन्यातील नवा उच्चांक नोंदवित कहर केला आहे. जिल्ह्यात ३१९ नवे बाधित रुग्ण आढळून आले असून यात शहरातील १५८ नव्या रुग्णांचा समावेश आहे. गंभीर बाब म्हणजे आरटीपीसीआर अहवालांमध्ये थेट ४८ टक्के रुग्ण बाधित आढळून आले आहेत. दरम्यान, ४१ वर्षीय महिलेसह चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पुन्हा ५० वर्षाखालील मृत्यू
जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी ५० वर्षाखालील बाधितांचे मृत्यू नोंदविण्यात आले आहेत. ४१ वर्षीय महिलेच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रविवारी ४७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. दुसरीकडे गंभीर रुग्ण कमी येत असल्याचे सांगितले जात असताना या दोन मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. चार मृत्यूपैकी दोन मृत्यू हे डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात तर गणपती रुग्णालय आणि चाळीसगावात प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे.
तज्ञ काय सांगतात
कमी वयाच्या रुग्णाला न्यूमोनिया अधिक प्रमाणात असल्यास, अन्य व्याधी असल्यास, उपचारास विलंब झाल्यास ही कारणे कोरोनात मृत्यूला कारणीभूत ठरू शकतात, दोनही महिलांचे केसपेपर तपासणी केल्यानंतर खरे कारण समोर येईल, असे जीएमसीतील औषध वैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भाऊराव नाखले यांनी म्हटले आहे.
रुग्ण आहेत असे
सक्रिय रुग्ण : १३०१
लक्षणे असलेले रुग्ण ३७२
सीसीमध्ये उपचार : ११
हॉटस्पॉट
जळगाव शहर : १५८
चाळीसगाव : ७१
अमळनेर : २०
चोपडा : १८
भुसावळ : १२
पॉझिटिव्हीटी
आरटीपीसीआर : ४८.५१ टक्के
ॲन्टीजन : १९. ८० टक्के
अशा झाल्या चाचण्या
४०४ आरटीपीसीआर अहवाल समोर आले
६२१ ॲन्टीजन चाचण्या घेण्यात आल्या
१२०४ अहवाल प्रलंबित
२४ तासात चौपट वाढ
जळगाव शहरात २४ तासात चौपटीने रुग्ण वाढले आहेत. केवळ महापालिकेच्या तपासणीत १४० रुग्ण बाधित आढळून आले असून रविवारी दिवसभरात ३८ रुग्ण बाधित आढळले होते, हीच संख्या महापालिकेत तब्बल १४० रुग्ण सोमवारी आढळून आले आहेत. त्या मानाने तपासण्यांसाठीही मोठी रांग लागत असल्याचे चित्र आहे. शहरासाठी ही बाब अत्यंत गंभीर असून नागरिकांनी नियम न पाळल्यास ही संख्या वाढतच राहिल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
अधिष्ठातांनी घेतली जिल्हा शल्यचिकित्सकांची भेट
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सी १ या नेत्र कक्षात २१ रुग्णांवर शस्त्रक्रिया करायची असल्याने दोन दिवस या शस्त्रक्रिया आटोपल्यानंतर रुग्णांची परिस्थिती बघून कोरोनासाठी हा कक्ष राखीव ठेवावा की नाही याबाबत चर्चा करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांची भेट घेतली. त्यानुसार परिस्थिती बघून याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.