रेल्वेत फोनवर बोलताना सराफाचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 19:03 IST2019-05-10T19:02:14+5:302019-05-10T19:03:31+5:30
चाळीसगावकडे काशी एक्सप्रेसने येत असताना नांदगाव ते न्यायडोंगरीदरम्यान त्यांना मोबाईलवर कॉल आला. वर्मा यांनी तो फोन उचलला तेव्हा ते दरवाज्याजवळ उभे होते.

रेल्वेत फोनवर बोलताना सराफाचा अपघाती मृत्यू
चाळीसगाव : येथील सराफ बाजारातील चेतन ज्वेलर्सचे संचालक प्रमोद वर्मा (वय ४०) यांचे गुरुवारी सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास नांदगाव ते न्यायडोंगरी दरम्यान अपघाती निधन झाले. धावत्या रेल्वेतून पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
याबाबत माहिती वृत्त असे की, ९ रोजी सकाळी ८ वाजता महानगरी एक्स्प्रेसने मनमाड येथे काही कामानिमित्त प्रमोद वर्मा हे गेले होते. काम आटपून चाळीसगावकडे काशी एक्सप्रेसने येत असताना नांदगाव ते न्यायडोंगरीदरम्यान त्यांना मोबाईलवर कॉल आला. वर्मा यांनी तो फोन उचलला तेव्हा ते दरवाज्याजवळ उभे होते.
फोनवर बोलत असतांना अचानक त्यांचा तोल गेल्याने ते धावत्या रेल्वेतून खाली पडले. या घटनेचे प्रत्यक्षदर्शनी चाळीसगाव सराफ बाजारातील कारागीर बद्री कढेल यांनी ही हकीगत सांगितली. नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांचा मृतदेह ठेवण्यात आला असून रात्री चाळीसगावी आणला.
गुरुवारी सराफ बाजारातील व्यापाऱ्यानी दुकाने बंद ठेवली. मयत प्रमोद वर्मा यांच्या पश्चात २ मुली, पत्नी, आई व भाऊ असा परिवार आहे. ते सराफ व्यापारी सुनील वर्मा यांचे लहान भाऊ होत.