‘भुता’ने छातीत सपासप पाइप टाकला अन् सत्या जागीच गतप्राण झाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:57 IST2021-02-05T05:57:26+5:302021-02-05T05:57:26+5:30
जळगाव : शाहू नगरातील शेख अल्तमस शेख शकील ऊर्फ सत्या (१९) याचा खून हा अगदी क्षुल्लक कारणावरून झाल्याचे उघड ...

‘भुता’ने छातीत सपासप पाइप टाकला अन् सत्या जागीच गतप्राण झाला
जळगाव : शाहू नगरातील शेख अल्तमस शेख शकील ऊर्फ सत्या (१९) याचा खून हा अगदी क्षुल्लक कारणावरून झाल्याचे उघड झाले. अझरुद्दीन ऊर्फ भूत फलीत शेख हुस्नोद्दीन ऊर्फ भिकन (२७,रा. इंदिरानगर, शाहूनगर) याने हा खून केला असून पोलिसांनी त्याला रात्रीतून जेरबंद केले. दरम्यान, शाहूनगरातील जळकी मिल हा अलीकडे खून व आत्महत्येचे केंद्र बनल्याचे दिसून येत आहे.
जळकी मिलच्या आवारात सत्या याचा खून झाल्याची घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे शाहूनगरात पुन्हा भीती व दहशतीचे वातावरण पसरले. दरम्यान, पोलिसांनी रात्रीतून अझरुद्दीन ऊर्फ भूत याला अटक केली. चौकशीत त्याने सत्या हा पडक्या खोलीजवळ दारू पीत होता, तेव्हा तू येथे काय करतो आहे रे.. असे विचारले असता तुला काय करायचे आहे.. असे प्रतिउत्तर सत्याने दिले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. खोलीत पडलेला लोखंडी पाईप उचलला आणि सपासप छातीत व पोटावर मारले, त्याशिवाय डोक्यातही दगड मारला, त्यामुळे तो जागीच गतप्राण झाला. ठार मारणे हा उद्देश नव्हता, परंतु वादात रागावर नियंत्रण न राहिल्याने ही घटना घडल्याची कबुली अझरुद्दीन याने पोलिसांकडे दिली.
रुग्णालयात घेतला मृत्यूचा अंदाज
घटनेनंतर फरार झालेला अझरुद्दीन हा काही वेळाने जिल्हा शासकीय रुग्णालयात गेला, तेथे त्याने सत्या खरेच मृत्युमुखी पडला का? याची माहिती घेतली. तेथील परिस्थिती पाहून तो उस्मानिया पार्क परिसरात गेला. ही माहिती गुन्हे शोध पथकाला मिळताच सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, विजय निकुंभ, उमेश भांडारकर, प्रफुल्ल धांडे, अक्रम शेख, भास्कर ठाकरे, दीपक सोनवणे, रतन गीते, तेजस मराठे व इतरांच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. दुसरीकडे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा व पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी घटनास्थळीच ठाण मांडून घटनेचे खरे कारण काय याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
यापूर्वीही घडल्या घटना
जळकी मिल भाग हा निर्मनुष्य आहे. या भागात दिवसा व रात्री कोणाचाच वावर नसतो. शेजारीच रेल्वेरूळ असल्याने या मार्गाकडे जाणारा रस्ता रहिवाशांनी बंद करून ठेवला आहे. रात्रीच्या वेळी व खासकरून रविवारी मद्यपींचाच या भागात वावर असतो. गेल्या वर्षी एका तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती, त्याशिवाय सहा वर्षांपूर्वी या भागात एक खून झालेला होता. आता ही तिसरी घटना आहे.