गांधीजींचे विचार तळागाळात पोहचताहेत
By Admin | Updated: January 30, 2015 14:58 IST2015-01-30T14:58:32+5:302015-01-30T14:58:32+5:30
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील महात्मा गांधी अभ्यास व संशोधन केंद्रातर्फे महात्मा गांधी यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे.

गांधीजींचे विचार तळागाळात पोहचताहेत
मनीष चंद्रात्रे■ जळगाव
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील महात्मा गांधी अभ्यास व संशोधन केंद्रातर्फे महात्मा गांधी यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असून या उपक्रमातूनच महात्मा गांधी यांचे विचाराचा प्रचार अन् प्रसार होत आहे.
विद्यापीठात २00६ साली महात्मा गांधी अभ्यास आणि संशोधन केंद्राची स्थापना झाली. महात्मा गांधींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा व तो देत असताना त्यांना करावा लागलेल्या संघर्षाविषयी माहिती विद्यार्थ्यांना महात्मा गांधी आणि संशोधन केंद्रातर्फे दिली जात आहे.
प्रमाणपत्र अभ्यासक्रम
शैक्षणिक वर्ष २0१४-१५ पासून विद्यापीठात गांधीयन थॉटस् हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू झाला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अभ्यासक्रमासाठी प्रवीष्ठ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
खान्देशात पोहचताहेत गांधींजींचे विचार
विद्यापीठातर्फे काही दिवसांपूर्वीच नंदुरबार, अमळनेर, धुळे व जळगाव येथे सॅटेलाईट यंत्रणा उभारण्यात आली आहे. २ ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गांधी सप्ताह आयोजित केला जातो. या सप्ताहांतर्गत संस्कार शिबिर, रक्तदान, चर्चासत्र व वक्तृत्व स्पर्धा घेतली जाते. सॅटेलाईट यंत्रणेद्वारे हे सर्व कार्यक्रम संपूर्ण खान्देशात दाखविले जातात. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरदेखील ते उपलब्ध करून दिले जातात.
विद्यापीठातील महात्मा गांधी अभ्यास केंद्रात स्वतंत्र ग्रंथालय आहे. या ग्रंथालयात महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित २२00 पुस्तकांचा संग्रह करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या अर्थसंकल्पातदेखील दीड ते दोन लाख रुपयांची तरतूद या विभागासाठी केली जाते. या निधीचा उपयोग पुस्तके खरेदीसाठी केला जातो.
महात्मा गांधी अभ्यास केंद्रातर्फे विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (युजीसी) निधी मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार युजीसीने २५ लाख रुपये अनुदान (२0१७ पर्यंत) या विभागाला दिले. या निधीचा उपयोग गांधीचे विचार अधिकाधिक तरुणापर्यंत पोहचविण्यासाठी केला जातो. या विभागातर्फे व्याख्यान, चर्चासत्र, चित्र प्रदर्शन, वक्तृत्त्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. महात्मा गांधी
पुण्यतिथी विशेष महात्मा गांधी यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी महात्मा गांधी अभ्यास व संशोधन केंद्र सज्ज आहे. युजीसीचे विशेष अनुदान प्राप्त झाले असून या निधीतून विविध कार्यक्रम विभागातर्फे राबविण्यात येत आहे.
-प्रा. डॉ. अनिल चिकाटे,
प्रभारी विभाग प्रमुख, महात्मा गांधी अभ्यास व संशोधन केंद्र
-----------------------------------
चंदू नेवे■ जळगाव
महात्मा गांधी यांचे प्रेरणादायी जीवनकार्य आणि सर्व सीमा रेषा ओलांडून पुरून उरलेली विचारसंपदा याबाबत जुन्या नव्या पिढीत आकर्षण कायम आहे, असे अनुभवाला येत आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी ३0 जानेवारी रोजी आहे. या दिवसाला हुतात्मा दिन संबोधत सारे राष्ट्र त्यांच्या जीवन कार्याचे स्मरण करते. या पार्श्वभूमीवर 'लोकमत'ने ज्सध्या व.वा.जिल्हा वाचनालयाच्या रामनारायण अग्रवाल सभागृहात सुरू असलेल्या 'अक्षरधारा' पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली, तेथे ही प्रचिती आली.
'जिथे श्रमाने गळतो घाम
तिथे नांदतो माझा राम' असे म्हणत श्रमप्रतिष्ठेला महत्त्व देणारे गांधीजी 'दुसर्याचे मन दुखविणे म्हणजेही हिंसाच !' , असे मानायचे.
माझा भारत खेड्यात आहे, असेही ते म्हणायचे..'अपरिग्रह' (गरजेपेक्षा जास्त वस्तू बाळगू नये) हाही त्यांच्या शिकवणुकीतील एक मंत्र!..त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रासंबंधीची अशी ठाम विचारसरणी जनमानसाला कायम संमोहित व प्रेरित करती झाली आहे.
प्रदर्शनातील माझे सत्याचे प्रयोग, गांधींचे अनमोल विचार (भाषणांचे संग्रह व निवडक उतारे), म.गांधी विचार दर्शन, राष्ट्रपिता म.गांधी, आरोग्याची गुरुकिल्ली, माझ्या स्वप्नातील भारत इ. अनेक पुस्तके युवक, प्रौढ, वयस्क अशा सर्व वयोगटातील वाचकांच्या, जिज्ञासूंच्या पसंतीला उतरत आहेत. सार्वजनिक वाचनालये आणि शिक्षण संस्था चालक यांच्याकडूनही या पुस्तकांना मागणी आहे, असे 'अक्षरधारा'चे दिगंबर पोरलेकर यांनी 'लोकमत'ला सांगितले.
शहरात आतापावेतो १४-१५ प्रदर्शने झाली आहेत, येथे अन्य ठिकाणच्या तुलनेत वाचकांचा चांगला प्रतिसाद लाभत असतो, असेही पोरलेकर यांनी सांगितले. महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित पुस्तके, आत्मचरित्र व ग्रंथाच्या आधारे संशोधक विद्यार्थ्यांना या पुस्तकांच्या आधारे चांगले संशोधन करता येऊ शकते. महात्मा गांधी यांच्या जन्मापासून ते देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत प्रत्येक टप्प्याची माहिती ग्रंथालयात उपलब्ध आहे.