अंत्यविधीप्रसंगी पित्यास फुटला अश्रूंचा बांध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2017 00:49 IST2017-01-04T00:49:28+5:302017-01-04T00:49:28+5:30
धरणगाव : पित्यास कृत्याचा झाला पश्चाताप

अंत्यविधीप्रसंगी पित्यास फुटला अश्रूंचा बांध
धरणगाव : संतापाच्या भरात स्वत:च्या मुलीचा गळा आवळून खून केल्यानंतर जन्मदाता असलेल्या आरोपीस मुलीवर अंत्यविधी करताना रडू कोसळले. या वेळी वातावरण गहिवरून आले होते.
पोलीस सूत्रांनुसार, अब्दुल कय्युम अब्दुल रहीम (वय ६७) याची मुलगी नसरीनबी मझर अहमद (वय २८) हिला पाळधी येथे दिले होते. मात्र वादामुळे दोन मुलं असताना तिचा घटस्फोट झाला होता व ती आपल्या माहेरी वडिलांकडे राहत होती.
धरणगाव येथील एका युवकाशी तिचे प्रेमसंबंध जुळले होते. तो नेहमी घरी येत असल्याने पित्यास खटकत होते. यातूनच त्याने संतापाच्या भरात तिचा खून केला.
या घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश पवार, पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुकदेव, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश सद्गीर आदींनी पंचनामा करून शवविच्छेदन केले.
यासंदर्भात धरणगाव पोलिसात भादंवि ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील करीत आहेत.
पित्यानेच दिला खांदा
या घटनेनंतर मुस्लीम पंच मंडळाने व नातेवाईकांनी अंत्यविधीची तयारी केली. आरोपी पित्यास पोलीस बंदोबस्तात या वेळी आणण्यात आले. त्याने खांदा दिला तेव्हा त्यास केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाल्याने त्याचा अश्रूचा बांध फुटला होता.
मयत नसरीनबी हिच्या पश्चात दोन मुले, आई, एक भाऊ व तीन बहिणी आहेत. या घटनेची चर्चा आज शहरात होती.
(वार्ताहर)