चौघा आमदारांची 'कवच' यात्रा !
By Admin | Updated: August 1, 2014 15:18 IST2014-08-01T15:18:12+5:302014-08-01T15:18:12+5:30
राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील आमदारांनी पालकमंत्री संजय सावकारे यांच्यासह मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यात आमदारांनी पालकमंत्र्यांची पाठराखण केल्याचे वृत्त आहे.

चौघा आमदारांची 'कवच' यात्रा !
जळगाव : राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील आमदारांनी पालकमंत्री संजय सावकारे यांच्यासह मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यात आमदारांनी पालकमंत्र्यांची पाठराखण केल्याचे वृत्त आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी पक्की करण्याच्या दृष्टीने या भेटीकडे पाहिले जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट झाली.
त्याचे निमित्त साधत पालकमंत्री सावकारेंसह चाळीसगावचे आमदार राजीव देशमुख, पाचोर्याचे आमदार दिलीप वाघ, अमळनेरचे अपक्ष आमदार व राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्य साहेबराव पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्याबाबत चर्चा केली. मात्र त्या वेळी पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात भेटण्याची सूचना केली. त्यानुसार गुरुवारी राष्ट्रवादी कार्यालयात या आमदारांनी पवार यांची भेट घेतल्याचे व या वेळी पाचोर्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व तालुकाध्यक्षही सोबत असल्याचे समजते.
■ पाचोर्यात महिला जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.अस्मिता पाटील यांनीही उमेदवारीसाठी दावा केलेला असल्याने विद्यमान आमदार दिलीप वाघ यांनी उमेदवारी पक्की करण्यासाठी पालकमंत्र्यांसोबत फिल्डिंग लावली.
■ अमळनेरमधून अपक्ष निवडून आलेले आमदार साहेबराव पाटील यांनी राष्ट्रवादीने हा अमळनेर मतदारसंघ काँग्रेसकडून मागून घ्यावा या मागणीसाठी चेंडू टाकला.
■ राजीव देशमुख यांनीदेखील उमेदवारी पक्की करणे व विकासकामे मार्गी लावण्याच्या दृष्टीने तर वरिष्ठांची नाराजी ओढवून घेतलेल्या पालकमंत्री सावकारे यांनी आमदारांकडून पाठराखण करून घेत स्वत:चे स्थान पक्के करण्याच्या दृष्टीने भेट घेतल्याचे मानले जात आहे.