कोरोेनामुळे बळी गेलेले चाळिशीच्या पुढील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:24 IST2020-12-05T04:24:57+5:302020-12-05T04:24:57+5:30
धरणगाव तालुक्यात कोरोना महामारीमुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त झालेली दिसून येतात. जगभरात या कोरोनाने थैमान घातलेले दिसून येते. मात्र, ...

कोरोेनामुळे बळी गेलेले चाळिशीच्या पुढील
धरणगाव तालुक्यात कोरोना महामारीमुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त झालेली दिसून येतात. जगभरात या कोरोनाने थैमान घातलेले दिसून येते. मात्र, आता ही परिस्थिती आटोक्यात आली आहे. सद्यपरिस्थितीला धरणगाव कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते. याठिकाणी काही नागरिक मृत पावले तर काही योग्य पद्धतीने उपचार घेऊन घरी आलेत.
तालुक्यातील साखरे येथे दोन भावांनी कोरोनाकाळात जीव गमावला, तर वाणी गल्ली परिसरातही अशाच क्लेशदायक घटना घडल्या. त्याचबरोबर काही नावाजलेले लोकदेखील यात मृत पावले. या महामारीमुळे प्रचंड प्रमाणात संकटे आली. या ठिकाणी काही जणांनी गोरगरिबांना प्रचार, प्रसार न करत मदत केली. त्यांना अन्नदान केले. गेल्या आठ महिन्यांपासून या महामारीचा सामना सुरू आहे. सर्वांना उत्सुकता आहे ती शाळा कधी सुरू होणार, सर्व गावांना बस कधी धावणार, रेल्वे नियमित कधी सुरू होणार याचीच.
धरणगाव तालुक्यात आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या २१२६ असून, मयत संख्या ४९ आहे. बरे झालेले २०६७ असून, केवळ दहा जण आता येथे उपचार घेत आहेत. मयतांचा वयोगट हा ४० ते ८० दरम्यानचा होता. यात बऱ्याच जणांना अन्य व्याधीही होत्या.
सावधता गरजेची
कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी नागरिकांनी सावधता बाळगणे गरजेचे आहे. मात्र, तशी परिस्थिती आज शहरात नाही. अनेक जण मास्क न लावता बाजारात येतात. हीच स्थिती विक्रेत्यांची असते. मात्र, त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. प्रशासनही दुर्लक्ष करत असल्याचेच लक्षात येत असल्याने दुसऱ्या लाटेच्या भीतीने उपाययोजना केल्या जाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या महामारीमुळे पोलीस प्रशासन, तहसीलदार, नायब तहसीलदार, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, समाजसेवक, नगरसेवक, नगराध्यक्ष या पद्धतीने विविध प्रकारच्या संघटनांनी परिश्रम घेतले. त्यांनीही आता जनजागृती करणे गरजेचे आहे.