पाच वर्षांत ८५६ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:54 IST2021-02-05T05:54:48+5:302021-02-05T05:54:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कर्जबाजारीपणा, नापिकी आणि निसर्गाचा लहरीपणा या साऱ्याला कंटाळून पाच वर्षांत जिल्ह्यात तब्बल ८५६ शेतकऱ्यांनी ...

In five years, 856 farmers have died | पाच वर्षांत ८५६ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

पाच वर्षांत ८५६ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कर्जबाजारीपणा, नापिकी आणि निसर्गाचा लहरीपणा या साऱ्याला कंटाळून पाच वर्षांत जिल्ह्यात तब्बल ८५६ शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. यासोबतच लॉकडाऊनमुळे यंदा ही संख्या वाढली आहे.

निसर्गाची अवकृपा, महागडे बियाणे, पेरणी करून न उगविलेले पीक, गेल्या वर्षी झालेला अतिपाऊस, दुबार पेरणी या साऱ्यात शेतकऱ्याच्या हातातून खरीप हंगाम गेला. तसेच कर्जमाफीबाबतही अनिश्चितता यामुळे खाजगी सावकार व सोसायट्यांकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत बळीराजा पडला. या साऱ्यात खचलेल्या बळीराजाने मृत्यूला कवटाळले व ८५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

लॉकडाऊनच्या काळात वाढली संख्या

गेल्या पाच वर्षांतील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या पाहता ती वाढतच गेली. यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळातही आत्महत्यांचे सत्र थांबले नाही. लॉकडाऊनच्या काळात सर्व जण घरी होते. मात्र बळीराजाची विवंचना काही संपली नाही. कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटल्याने तोंडावर आलेल्या खरीप हंगामासाठी पैसा कसा उभा करायचा या विवंचनेत शेतकरी सापडला. यासोबतच बँकांसमोर असलेल्या रांगा पाहता कर्ज कसे उपलब्ध होणार यामुळे चिंतेत भर पडली. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये मार्च ते जुलै या चार महिन्यांच्या काळात ४१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

अनुदानही झाले होते ‘लॉक’

लॉकडाऊनच्या काळात प्रवास बंद झाल्याने समिती सदस्य येणे शक्य नसल्याने व शासनाने कार्यालयातील उपस्थिती, बैठकांवर घातलेले निर्बंध यामुळे शेतकरी आत्महत्या अनुदान वाटप जिल्हास्तरीय समितीची बैठकही होऊ शकली नव्हती. त्यामुळे मयत शेतकऱ्यांच्या वारसांना कोरोनाच्या संकटाने मदतही मिळू शकत नव्हती. त्यानंतर मात्र ऑगस्टपासून बैठका सुरू झाल्याने प्रकरणे मार्गी लागू लागली.

४०९ जणांना मदत

पाच वर्षांत जिल्ह्यात ८५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर शेतकरी आत्महत्या अनुदान वाटप जिल्हास्तरीय समितीकडे मोबदल्यासाठी प्रकरणे दाखल झाली. त्यावर निर्णय होऊन ४०९ शेतकऱ्यांच्या वारसांना मदत देण्यात आली. मात्र वेगवेगळ्या कारणांनी ४४७ प्रकरणे अपात्र ठरली.

Web Title: In five years, 856 farmers have died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.