रतलामजवळील अपघातात जळगावचे पाच जण ठार

By Admin | Updated: May 10, 2014 19:46 IST2014-05-10T19:43:51+5:302014-05-10T19:46:44+5:30

महावीर कुमावत खेमराज कुमावत कंकुदेवी कुमावत ओमप्रकाश कुमावत गोपाल कुमावत जळगाव : मध्यप्रदेशातील रतलाम पासून काही अंतरावर असलेल्या हसन पालिया टोलनाक्याजवळ..

Five people killed in Jalgaon near Ratlam | रतलामजवळील अपघातात जळगावचे पाच जण ठार

रतलामजवळील अपघातात जळगावचे पाच जण ठार



महावीर कुमावत खेमराज कुमावत कंकुदेवी कुमावत ओमप्रकाश कुमावत गोपाल कुमावत जळगाव : मध्यप्रदेशातील रतलाम पासून काही अंतरावर असलेल्या हसन पालिया टोलनाक्याजवळ शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास ट्रेलरने दिलेल्या धडकेत जळगाव येथील सावलिया केटर्सचे संचालक गोपाल महाराज कुमावत यांच्यासह कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कारमधील पाच जण बचावले आहेत. मृतांवर राजस्थान येथील त्यांच्या कोरनाथ या मुळ गावी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
जळगाव येथील प्रसिद्ध सावलिया केटर्सचे संचालक गोपाल कन्हैयालाल कुमावत हे कुटुंबासह पाच दिवसांपूर्वी राजस्थान येथील भिलवाडा जिल्ह्यातील कोरनाथ गावी गेले होते. नात्यातील व्यक्तीचा विवाह समारंभ आटोपून गुरुवारी रात्री ते जळगावकडे येण्यासाठी आपल्या एमएच १९ बीजे ४५३२ या कारने निघाले होते. यावेळी कारमध्ये चालक महावीर मांगीलाल कुमावत (वय-३0), गोपाल कुमावत (वय-४५), पत्नी कंकुदेवी कुमावत (वय-३0), भाऊ खेमराज कुमावत (वय-४0), ओमप्रकाश रामलाल कुमावत (वय-१८), मुले भावना कुमावत, वैष्णवी कुमावत, राजेश कुमावत, शामलाल कुमावत व भाचा प्रभू कुमावत बसलेले होते.
रात्री कार रतलाममधून निघाल्यानंतर जावरा गावापासून काही अंतरावर असलेल्या हसनपालिया टोलनाक्याजवळ आली. या ठिकाणी चालक महावीर याने जवळच असलेल्या पेट्रोलपंपवर डिझेल भरण्यासाठी कार वळविली. डिझेल भरून कार रस्त्याला लागत असताना समोरून भरधाव येणार्‍या ट्रेलरने जोरात धडक दिली. यात कारचालक महावीर कुमावतसह गोपाल कुमावत, कंकुदेवी कुमावत, खेमराज कुमावत, ओमप्रकाश कुमावत हे पाच जण जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की कार दहा ते पंधरा फुटापर्यंत फेकली गेली.
या अपघातात गोपाल महाराज यांची दोन मुले व दोन मुली व भाचा मात्र थोडक्यात बचावले. अपघातानंतर पेट्रोलपंपावरील कर्मचारी तसेच टोलनाक्यावरील काही नागरिकांनी जखमींना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. अपघातातील मयतांना शासकीय दवाखान्यात आणल्यानंतर शुक्रवारी दुपारी शवविच्छेदन करण्यात आले.
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर गोपाल महाराज यांचे राजस्थानमधील नातेवाईक रतलामच्या दिशेने रवाना झाले. शवविच्छेदनानंतर मृतदेह राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील कोरनाथ गावी नेण्यात आले. संध्याकाळी मयतांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जळगावातील प्रेमनगर येथील त्यांच्या निवासस्थानी त्याचे आप्त, स्वकीय व मित्र परिवाराने गर्दी केली होती.

 

test update

Web Title: Five people killed in Jalgaon near Ratlam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.