दहा कर्मचार्यांना मनपाकडून फुकटचा पगार
By Admin | Updated: July 1, 2014 14:52 IST2014-07-01T14:52:52+5:302014-07-01T14:52:52+5:30
मनपाच्या पाणीपुरवठा विभागातील हातपंप दुरुस्तीसाठी नेमलेले दहा कर्मचारी साहित्याअभावी काम बंद असल्याने गेल्या तीन वर्षांपासून अक्षरश: फुकटचा पगार घेत आहेत.

दहा कर्मचार्यांना मनपाकडून फुकटचा पगार
जळगाव : मनपाच्या पाणीपुरवठा विभागातील हातपंप दुरुस्तीसाठी नेमलेले दहा कर्मचारी साहित्याअभावी काम बंद असल्याने गेल्या तीन वर्षांपासून अक्षरश: फुकटचा पगार घेत आहेत. सागरपार्कवरील कार्यालय सकाळी तास-दीड तास उघडून नंतर हे कर्मचारी गायब होत असल्याचे चित्र आहे. मात्र पाणीपुरवठा अभियंत्यांचाच आशीर्वाद असल्याने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे.
३ वर्षांपासून निविदाच नाही
मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने हातपंप दुरुस्तीसाठी साहित्य खरेदी करण्याकरिता गेल्या ३ वर्षांपासून निविदाच मागविलेली नाही. त्यामुळे हात पंप दुरुस्तीसाठी साहित्यच उपलब्ध नाही. त्यामुळे साहित्य उपलब्ध असतानाही कामाकडे दुर्लक्ष करणार्या कर्मचार्यांची साहित्य नसल्याने चंगळ झाली आहे. केवळ मनपा स्तरावर किरकोळ दुरुस्तीचे काम केले जात आहे.
दीड-दोन तास उघडते कार्यालय
सागरपार्कवर विद्युत व हातपंप दुरुस्ती विभागाचे कार्यालय आहे. सकाळी दीड-दोन तास हे कार्यालय उघडते. या विभागात मूळ क्लोरीन ऑपरेटर म्हणून नियुक्ती असलेले भांडारकर हे प्रमुख आहेत. तसेच अन्य ८-९ कर्मचारी आहेत. मात्र साहित्य नसल्याने कामच नाही. त्यामुळे नंतर हे कर्मचारी सोयीने घरी निघून जात असल्याचे समजते.
३ वेळा केली बदली रद्द
मूळ क्लोरीन ऑपरेटर म्हणून नियुक्ती असलेले भांडारकर यांची जलशुद्धीकरण केंद्रावर तीन वेळा बदली करण्यात आली व तीनही वेळा त्यांनी ती रद्द करून घेतल्याचे समजते. त्यामुळे उपायुक्त गांगोडे यांनी त्यांच्या टिपणीत दरवेळा बदली रद्द करून घेत असल्याचा शेराही मारला असल्याचे समजते. १८५ विद्युतपंपही गायब
मनपा पाणीपुरवठा विभागाच्या रेकॉर्डनुसार शहरात तब्बल २४५ बोअरिंगवर विद्युतपंप बसविण्यात आले होते. मात्र आज त्यापैकी केवळ ६0 पंप शिल्लक आहेत. उर्वरित १८५ विद्युत पंप गायब झाले आहेत. त्यापैकी काही जमिनीत दाबले गेले असे मान्य केले तरीही अन्य पंपांचे काय? असा सवाल उपस्थित होतो. मात्र प्रत्यक्षात या पंपांची सोयीस्करपणे विल्हेवाट लावली गेली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मनपाचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.