जिल्ह्यातील मतदारांचा अखेर परिवर्तनाला कौल
By Admin | Updated: October 20, 2014 09:54 IST2014-10-20T09:54:35+5:302014-10-20T09:54:35+5:30
जिल्ह्यातील मतदारांनी विधानसभा निवडणुकीत परिवर्तनाला स्पष्ट कौल दिला आहे. जिल्हय़ातील ११ पैकी सहा भाजपाला, तर शिवसेनेला तीन जागांवर विजयी केले.

जिल्ह्यातील मतदारांचा अखेर परिवर्तनाला कौल
विधानसभा निवडणूक : राष्ट्रवादीला जबर फटका, काँग्रेसची दुर्दशा, भाजपा-शिवसेनेची पुन्हा मुसंडी..
जळगाव : जिल्ह्यातील मतदारांनी विधानसभा निवडणुकीत परिवर्तनाला स्पष्ट कौल दिला आहे. जिल्हय़ातील ११ पैकी सहा भाजपाला, तर शिवसेनेला तीन जागांवर विजयी करून मतदारांनी तुटलेल्या युतीला अजूनही वेळ गेलेली नाही, असाही संकेत दिला आहे. दरम्यान, गेल्या वेळी तब्बल पाच जागा मिळवणार्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एकाच जागेवर विजयी करून मतदारांनी या पक्षाला साफ झिडकारले आहे. तर एकेकाळी काँग्रेसचा मजबूत गड असलेल्या जिल्ह्यात या पक्षाची आता केवळ दुर्दशा पाहण्याची वेळ काँग्रेसजनांवर आली आहे. जिल्ह्यात भाजपाच्या प्रचाराचा झंझावात आणि मोदींच्या रूपात लोकसभा निवडणुकीत आलेली परिवर्तनाची लाट विधानसभेतही कायम राहिल्याचे चित्र स्पष्टपणे समोर आले आहे. दरम्यान, गेल्या निवडणुकीत रावेर आणि अमळनेर या मतदारसंघांतून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या शिरीष मधुकरराव चौधरी आणि साहेबराव धोंडू पाटील या दोघांना मतदारांनी पराभवाची धूळ चारली. मात्र अमळनेरात परिवर्तन घडविताना मतदारांनी शिरीष हिरालाल चौधरी या अपक्षालाच विधानसभेत पाठविले आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर, सुरेशदादा जैन, राजीव देशमुख, चिमणराव पाटील, जगदीश वळवी, दिलीप वाघ, साहेबराव पाटील, शिरीष चौधरी या मावळत्या आमदारांचे पराभूत होणे त्या त्या पक्षांसाठी धक्कादायक ठरले आहे. पाच नव्या चेहर्यांना मतदारांनी प्रथमच संधी दिली आहे.
------------
जिल्ह्यात निवडणुकीत काँग्रेसचा पार सफाया झाला आहे. तर राष्ट्रवादीचेही वर्चस्व संपुष्टात आले. या पक्षाचे सर्व मावळते आमदार पराभूत झाले. केवळ एका जागेवर विजय मिळाल्याने नावालाच अस्तित्व उरले आहे. राष्ट्रवादीच्या २00४ मध्ये भुसावळ, एरंडोल व जळगाव शहर या तीन जागा ताब्यात होत्या. २00९ च्या निवडणुकीत ताकद वाढून पाचोरा, भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, जळगाव ग्रामीण या पाच जागा जिंकत जिल्ह्यावर वर्चस्व सिद्ध केले. त्यात अमळनेरमधून अपक्ष निवडून आलेले साहेबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. मात्र यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे पानिपत झाले असून केवळ एरंडोलची एक जागा राखण्यात यश आले आहे. माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील हे निवडून आले आहेत. जळगाव शहरात गत निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढविणार्या मनोज चौधरी यांनी यंदा राष्ट्रवादीकडून लढूनही केवळ ४ हजार ८३५ मते मिळाली आहेत. २00४ च्या निवडणुकीत यावलच्या जागेवर काँग्रेसचे रमेश चौधरी निवडून आले होते. तर २00९ मध्ये एकही उमेदवार विजयी झाला नव्हता. मात्र रावेरमधून अपक्ष निवडून आलेल्या शिरीष मधुकरराव चौधरी यांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व पत्करले होते. मात्र यंदा ती जागाही हातची गेली आहे.