नूतन मराठाच्या बाहेर हाणामारी; १२ दिवसांनी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:12 IST2021-06-27T04:12:06+5:302021-06-27T04:12:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : नूतन मराठा महाविद्यालयाच्या बाहेर १५ जून रोजी रात्री १०.३० वाजता दोन गटात झालेल्या हाणामारीप्रकरणी ...

नूतन मराठाच्या बाहेर हाणामारी; १२ दिवसांनी गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : नूतन मराठा महाविद्यालयाच्या बाहेर १५ जून रोजी रात्री १०.३० वाजता दोन गटात झालेल्या हाणामारीप्रकरणी तब्बल १२ दिवसांनी अर्थात शनिवारी (दि. २६) १० ते १२ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात कल्पेश भोईटे, प्रशांत भोईटे, भूषण वाघ व महेश आनंदा पाटील अशी चार जणांची नावे असून, इतर अज्ञात व्यक्ती म्हटले आहे.
पोलिसांनीच सरकारतर्फे फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला. दरम्यान, संस्थेवर ताबा मिळावा यासाठी पाटील व भोईटे या दोन्ही गटात धुसफूस असून, ती कायम आहे.
जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल संजीव नामदेव नारखेडे (वय ५४, रा.योगेश्वरनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १५ जून रोजी दुपारी २ व रात्री ८ ते १६ रोजी सकाळी ८ अशी नूतन मराठा महाविद्यालयात फिक्स पॉइंट ड्यूटीवर होतो. त्यावेळी होमगार्ड नीलेश पाटील, भिकन लोहार, प्रवीण दराडे व शिवदास कळसकर आदीदेखील सोबत ड्यूटीला होते. रात्री १०.३० वाजता कल्पेश भोईटे, भूषण वाघ व प्रशांत भोईटे असे एका दुचाकीवर आले व कारची हवा कशी काय गेली म्हणून आम्हाला विचारणा केली, त्यावर आम्हाला माहिती नाही, असे त्यास सांगितले असता महाविद्यालयाच्या कार्यालयातून महेश आनंदा पाटील हा ३ ते ४ जणांना घेऊन बाहेर आला. त्यावेळी कल्पेश भोईटे याने त्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर पाटील यानेही शिवीगाळ केली. वाद होऊ नये म्हणून कल्पेश व त्याच्यासोबतच्या लोकांना गेटच्या बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर महेश पाटील व इतरही गेटच्या बाहेर गेले. तेथे काही वेळातच हातात लाठ्याकाठ्या घेऊन हे सर्व जण हाणामारी करायला लागले. पोलिसांनी बाहेर जाऊन पाहिले असता सर्व जण पळून गेले. भूषण वाघ याच्या पायाला लागल्याने त्याला पळता आले नाही. पोलिसांनी त्याला कारण विचारले असता कामावरून घरी जात असताना कल्पेश व प्रशांत यांच्याकडून लिफ्ट घेऊन तिघं जण घरी जात असताना कल्पेश याला महाविद्यालयात काम असल्याने तिकडे दुचाकी नेली व आतमध्ये वाद झाला, असे त्याने पोलिसांना सांगितले. या घटनेनंतर पोलीस निरीक्षक विलास शेंडे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कल्पेश व महेश पाटील हे जखमी अवस्थेत तेथून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गेले, तर भूषण याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले.
पोलीस ठाण्यात दोन दिवस चौकशी
या घटनेनंतर दोन्ही गटात धुसफूस सुरू होती. त्यानुसार दोघं गटाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. दोघांनी पोलिसांकडे आपली बाजू मांडली. शेवटी १२ दिवसांनी पोलिसांनीच सरकारतर्फे फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला. दंगल व सार्वजनिक ठिकाणी गैरकायद्याची मंडळी जमा करून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणल्याचा ठपका ठेवण्यात आला.
कोट..
दोन्ही गट परस्परविरोधी तक्रार देण्यासाठी आले होते. खोटा गुन्हा दाखल करावा म्हणून आग्रह होता. महाविद्यालयात पोलीस बंदोबस्त आहे. त्यामुळे त्या दिवशी जे घडले ते आमच्या पोलिसांनी बघितले आहे. त्यानुसारच जे घडले त्याप्रमाणे सरकारतर्फे फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला.
- विलास शेंडे, पोलीस निरीक्षक, जिल्हा पेठ