पंधरा दिवसांपासून विज नसल्याने शेतकऱ्यांची महावितरणच्या कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:58 IST2021-02-05T05:58:59+5:302021-02-05T05:58:59+5:30
जळगाव : धानवड, चिंचोली, कंडारी या गावांमध्ये कृषी पंपासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून विज पुरवठा खंडित असल्यामुळे, पिकांचे नुकसान होत ...

पंधरा दिवसांपासून विज नसल्याने शेतकऱ्यांची महावितरणच्या कार्यालयावर धडक
जळगाव : धानवड, चिंचोली, कंडारी या गावांमध्ये कृषी पंपासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून विज पुरवठा खंडित असल्यामुळे, पिकांचे नुकसान होत आहे. तक्रार करुनही विज पुरवठा सुरळीत होत नसल्याने येथील शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी जयकिसन वाडीतील कार्यालयावर धडक देऊन, कार्यकारी अभियंत्यांना घेराव घातला. तसेच दोन दिवसात विज पुरवठा सुरळीत न केल्यास रस्ता रोको करण्याचा इशाही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
महावितरणतर्फे कृषी पंपासाठी वेळापत्रकानुसार आठ तास देण्यात येत असून, आतापर्यंत धानवड, उमाळा, चिंचोली, कंडारी या गावातही वेळापत्रकानुसारच विजपुरवठा देण्यात येत आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विज पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे शेतकरी बांधवांना पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. त्यामुळे मंगळवारी येथील १०० ते १५० शेतकरी बांधवांनी बुधवारी महावितरणच्या कार्यालयात येऊन पिकांच्या होत असलेल्या नुकसानीबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिली. यावेळी शेतकऱ्यांनी जो पर्यंत वीज वितरणाचे व्यवस्थितपणे नियोजन केले जात नाही तोपर्यंत प्रभारी कार्यकारी अभियंता यांचे दालन न सोडण्याचा पवित्रा घेतला होता. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, यावेळी स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार शेतकरी बांधवांनी प्रभारी अभियंता एम. बी. चौधरी यांच्या निदर्शनास आणून दिला. यावेळी चौधरी यांनी संबधित अधिकाऱ्याला बोलवून घेत शेतकऱ्यांशी समन्वय ठेवावा व त्यांचा प्रत्येक फोन घेण्याची सक्त ताकीद दिली.
तर दोन दिवसांत रास्ता रोकोचा इशारा
शेतकऱ्यांसोबत ग्रामीण भागातील शिवसेनेचे युवा सेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, दिलीप चव्हाण, चिंचोलीचे शरद घुगे, युवा सेना तालुका सरचिटणीस अविनाश पाटील, जनार्धन पाटील, कालिदास पाटील, राकेश घुगे,
आबा घुगे, उमाळ्याचे माजी सरपंच अनिल खडसे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यांनी दोन दिवसात विज पुरवठा सुरळीत सुरू न झाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा दिला. तर शेतकरी बांधवांनी थेट उमाळा येथील जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे.