शेतकरी संकटात
By Admin | Updated: July 1, 2014 14:43 IST2014-07-01T14:43:41+5:302014-07-01T14:43:41+5:30
गेल्या अनेक वर्षात अपवाद वगळता जून महिना कोरडा गेल्याने शेती उजाड आणि शेतकर्यांची अवस्था दयनीय झाली आहे.

शेतकरी संकटात
>
चंदू नेवे■ जळगाव
गेल्या अनेक वर्षात अपवाद वगळता जून महिना कोरडा गेल्याने शेती उजाड आणि शेतकर्यांची अवस्था दयनीय झाली आहे. येत्या ५-७ दिवसात पाऊस न आल्यास पिकांचे नियोजनही कोलमडण्याची आणि अन्नधान्याच्या टंचाई व महागाईची स्थिती उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या कितीतरी वर्षात एवढी भीषण अवस्था पाहाण्यात नाही..असे जुन्याजाणत्यांचे म्हणणे आहे.
हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा १ जुलै हा दिवस जन्मदिवस. हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त जिल्ह्यातील शेतकर्यांचा घेतलेला वेध..
संकटांची रांग निर्माण होण्याची भीती
पावसाने ताण दिल्याने शेतीशी निगडित हजारो कुटुंबे हवालदिल झाली आहेत. शेतमजुरांची उपासमार, भूजल पातळी खालावत असल्याने पेयजलाची टंचाई तसेच चार्याअभावी पशूधनाचे हाल, पुढे दुधाची टंचाई इ. कितीतरी संकटांची रांग निर्माण होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. पाऊस नसल्याने कीटकजन्माची आणि त्यावर अवलंबून असलेली पक्ष्यांच्या अन्नाची साखळी तुटण्याचा आणि पक्ष्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.
२0१२ या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, २0१३ या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस व खरिपाचा हंगाम ऐन हाती येण्याच्या अवस्थेत असताना झालेली अभूतपूर्व गारपीट नंतर रब्बीचा हंगाम हाती येण्याच्या बेताला असताना झालेला अकाली पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकरी कोसळून पडला. तर यंदाचे वर्ष त्यापेक्षा भीषण वाईट जाते की काय?..असा भयकंपित स्वर व्यक्त होत आहे.
पूर्व हंगामी कापूसही धोक्यात
जिल्ह्यात सात लक्ष हेक्टर क्षेत्र पेरणीविना पडून आहे, तर फक्त ७३ हजार हेक्टर क्षेत्रावर पूर्व हंगामी कापसाची लागवड झालेली आहे. पर्जन्यराजाने पाठ फिरवल्याने बागायत नसलेल्या क्षेत्रातील हा कापूस धोक्यात आला आहे.
आद्र्रा नक्षत्र आणील काय पाऊस?
रोहिणी, मृग जवळपास कोरडे गेलेले असताना २७ जूनला सुरू झालेले आद्र्रा नक्षत्र तरी वेधशाळेच्या अंदाजानुसार पाऊस घेऊन येईल, अशी आर्त आळवणी होत आहे.
ममुराबाद-कानळदा शिवारात शेती आहे. उन्हाळी कापूस पेरला आहे, तो अर्धा फूट वर आला आहे, ममुराबाद शिवारातला कापूस लेंडीनाल्याचा पाण्यावर जगवण्याची वेळ आली आहे. लहान व जिरायतवाल्या शेतकर्यांना तर जगावे कसे, पोराबाळांना काय खाऊ घालावे, याची चिंता आतापासून भेडसावत आहे.
-अशोक काळे, शेतकरी, जुने जळगाव कानळदा शिवारात तीन एकरावर उन्हाळी कापूस पेरला, विहीर आटली आहे. सात एकर जमीन तयार आहे, हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार १0 दिवसांनी पाऊस येईल, तरीही उडीद, मूग आणि सोयाबीनचा पेरा केला तरी उत्पादन निम्मेच येण्याची शक्यता आहे. कर्ज काढून बियाणे घेऊन ठेवलेले आहे. आता पुढे देवाच्या कृपेची गरज आहे.
-शेखर अत्तरदे, शेतकरी, विठ्ठलपेठ आव्हाणे शिवारात शेती आहे. सोयाबीन पेरण्याचे नियोजन आहे, पण पाऊसच नसल्याने परिस्थिती खूपच वाईट आहे. पाऊस लांबला तर गहू पेरावा लागेल, तो जगवण्याठी ९00 फूट अंतरावरील शेतावाल्याकडून पाणी घेण्याची वेळ येईल. २५ हजार रु. वि.का.सो.चे कर्ज काढावे लागले. पावसाची आतुरतेने वाट पहातोय.
-अरविंद काळे, शेतकरी, जयकिसनवाडी. आधी गारपीट, अकाली पावसाच्या थैमानामुळे आणि आता पावसाने दांडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्हा प्रशासनाने २२ जूनअखेर प्राप्त माहितीनुसार १५ जानेवारी ते २२ जून २0१४ या सुमारे सहा महिन्यांच्या काळात जिल्ह्यात एकूण ५८ शेतकर्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. यात मार्च आणि एप्रिलमध्ये सर्वाधिक आत्महत्या झालेल्या आहेत.