पिकांची नासाडी पाहून घरी परतताच शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 21:07 IST2019-11-05T21:07:40+5:302019-11-05T21:07:45+5:30

म्हसले येथील घटना : दीड बिघे शेतीतील उत्पन्नावर चालायचा निर्वाह

Farmer commits suicide after returning home after seeing crop damage | पिकांची नासाडी पाहून घरी परतताच शेतकऱ्याची आत्महत्या

पिकांची नासाडी पाहून घरी परतताच शेतकऱ्याची आत्महत्या



अमळनेर : तालुक्यातील म्हसले येथील भरत छबिलदास पाटील (वय ४२) या शेतकऱ्याने उद्ध्वस्त पिके पाहून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना ४ रोजी सायंकाळी साडे सात वाजता घडली.
सततच्या पावसाने पिके कुजल्याने उत्पन्न हातचे गेले असून ४ रोजी भरत पाटील आपल्या शेतात पिकांची परिस्थिती पाहायला गेले. पिकांचे झालेले नुकसान पाहून त्यांचा धीर सुटला. कमी क्षेत्रातही हातातोंडाशी आलेले सर्वच पीक हातचे गेल्याने ते निराश झाले होते. आधीच फक्त दीड बिघे शेत आणि चार वर्षे दुष्काळात होरपळलेल्या भरत पाटील यांनी शेतातील पिकांची नासाडी पाहून ते घरी परतल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या लग्नासाठी पैसे नसल्याच्या चिंतेने ते निराश होते, अशी माहिती मिळाली आहे.
याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास ए.एस.आय. प्रभाकर पाटील करीत आहेत.

 

 

Web Title: Farmer commits suicide after returning home after seeing crop damage