सुनील पाटील
जळगाव : राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने बदल्यांवरील स्थगिती उठविल्याने पोलीस दलातही आता बदल्यांचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. शासन नियमाप्रमाणे यंदा १५ टक्के बदल्या होणार असून त्या आकडेवारीनुसार जिल्हा पोलीस दलात ४८२ कर्मचारी बदलीपात्र आहेत. बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी केलेल्या अर्जावरून ३० टक्के पोलिसांना स्थानिक गुन्हे शाखेतच बदली हवी आहे. त्यासाठी अनेकांनी मंत्री, आमदार, खासदार व ओळखीच्या अधिकाऱ्यांमार्फत फिल्डिंग लावली असून काही जणांना स्थगिती हवी आहे.
खंडित, अखंडित सेवेत ज्यांना एका उपविभागात बारा वर्षे पूर्ण झालेली आहेत, त्यांनीही यंदा स्थगिती मागितली आहे. गेल्या वर्षी तसेच दोन वर्षांपासून स्थगिती मागणाऱ्यांनीदेखील यंदा स्थगिती मागितली आहे. दरम्यान, शासन नियमानुसार १५ टक्के याप्रमाणे ४८२ कर्मचारी बदलीपात्र आहेत. परंतु ज्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे, अशा कर्मचाऱ्यांची संख्या ६५२ इतकी होत आहे.
काय आहे शासन आदेश?
कोविड-१९ चे कारण व तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून सरकारी विभागातील बदल्यांना ३० जूनपर्यंत देण्यात आलेली स्थगिती शासनाने उठविली आहे. मर्यादित स्वरूपात १४ ऑगस्टपर्यंत बदल्या करण्यास सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिलेली आहे. मात्र सर्वसाधारण बदल्या या ३१ जुलैच्या आतच कराव्या लागणार आहेत. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचा आदेश जारी झालेला असला तरी पोलीस दलासाठी अद्याप महासंचालकांचा आदेश झालेला नाही.
पोलीस कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या -६५२
कोणत्या उपविभागातून किती?
जळगाव उपविभाग-११५
भुसावळ उपविभाग-६५
मुक्ताईनगर उपविभाग-४१
फैजपूर उपविभाग-३१
चाळीसगाव उपविभाग-८३
पाचोरा उपविभाग-५४
अमळनेर उपविभाग-५२
चोपडा उपविभाग-४२
पोलीस मुख्यालय -८६
जिल्हा विशेष शाखा-११
स्थानिक गुन्हे शाखा-१८
शहर वाहतूक शाखा-१२
उपविभागीय कार्यालय व इतर शाखा-४२
या पोलीस ठाण्यांना पसंती
स्थानिक गुन्हे शाखा - स्थानिक गुन्हे शाखेचे कार्यक्षेत्र संपूर्ण जिल्हा असून प्रभावी शाखा म्हणून याकडे पाहिले जाते. ही शाखा थेट पोलीस अधीक्षकांच्या नियंत्रणात असते. या शाखेकडे जाण्याचे दोन उद्देश असतात. प्रभावी कामगिरी करायला या शाखेत वाव आहे, दुसऱ्या अर्थकारणाशी संबंधित अनेक प्रकरणे या शाखेकडे असतात. वाळू, गुटखा, अवैध दारू व गुन्हेगारीवर या शाखेचा प्रभाव असतो.
शहर वाहतूक शाखा - शहर वाहतूक शाखा एका अर्थाने कटकटीची शाखा मानली जाते. दुसरी बाजू अशी आहे की, रोज येथे वाहनधारकांशी संबंध येतो. महामार्गावर ड्युटी लागते. वाहन तपासणीचे अधिकार व इतर बाबी आहेतच.
चाळीसगाव - चाळीसगाव व पाचोरा या दोन पोलीस ठाण्यांची हद्द मोठी आहे. क्रीम पोलीस ठाणे म्हणून यांच्याकडे पाहिले जाते. वाळू, गुटखा व अवैध दारूचे प्रमाण या भागात जास्त आहे. या उपविभागात शक्यतो आयपीएस अधिकारी नियुक्त होत नाही.
मुक्ताईनगर, जामनेर नको रे बाबा !
मुक्ताईनगर पोलीस ठाणे - मुक्ताईनगर, जामनेर व पहूर पोलीस ठाण्याला अनेक जण नाक मुरडतात. या ठिकाणी राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात असल्याने काम करताना रोषाला सामोरे जावे लागते.
जिल्हा पेठ - जळगाव शहरातील जिल्हा पेठ व जळगाव शहर या दोन पोलीस ठाण्यांमध्ये काम करायला वावच नाही. जिल्हा पेठ पोलीस तर बंदोबस्त करणारे पोलीस ठाणे झालेले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सतत आंदोलने सुरू असल्याने तेच काम करावे लागते. त्याशिवाय गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे.