जिल्ह्यात दर दोन दिवसांनी एक तरुणी रफूचक्कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:18 IST2021-09-18T04:18:25+5:302021-09-18T04:18:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा अहवाल नुकसाच प्रसिद्ध झाला आहे. त्यासोबतच पोलीस दलाकडे असलेल्या ...

जिल्ह्यात दर दोन दिवसांनी एक तरुणी रफूचक्कर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा अहवाल नुकसाच प्रसिद्ध झाला आहे. त्यासोबतच पोलीस दलाकडे असलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यात दर दोन दिवसांनी एक तरुणी रफूचक्कर होत असल्याचे समोर आले आहे. तसेच जिल्ह्यात २०२० मध्ये १७७ तरुणी पळून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर २०२० मध्ये ५८ खून आणि ८१ बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत.
घटना क्रमांक १
जळगाव शहरात काही दिवसांपूर्वी पुतण्याने काकाचा खून केल्याची घटना घडली आहे. आंबेडकरनगरात राजू सोनवणे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून पुतण्या विशाल अनिल सोनवणे याने खून केला. विशाल हा व्यसनाधीन असून त्याने वादातूनच त्यांची हत्या केली. या हत्येनंतर जळगाव शहरात खळबळ उडाली होती. त्याच्या एक दिवस आधीच दीपक राठोड आणि गोपाल राठोड यांनी वडिलांच्या प्रेमसिंग यांच्या छातीत चॉपर खुपसून हत्या केली होती.
घटना क्रमांक २
अमरावती येथील भारत राजा चावरे (२१) याने जळगाव शहरात मामाकडे राहत असलेल्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्यामुळे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. तसेच या प्रकरणात त्याने यात अमरावतीच्या सहायक पोलीस आयुक्तांचीही दिशाभूल केली होती. संबंधित तरुणीचे वय १४ असतांनाही खोटी कागदपत्रे सादर केली आणि तरुणीकडे दुसऱ्याचे लहान बाळ देत हे त्या दोघांचे बाळ असल्याचा बनावदेखील केला होता. या प्रकरणी ३० ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला होता.
घटना क्रमांक ३
तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय तरुणीवर तिच्या आतेभावानेच जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. पीडितेचे आईवडील शेतात गेलेले असताना तिच्या आतेभावानेच तिच्यावर अत्याचार केला आहे. त्याने तिला याची वाच्यता न करण्याची धमकी दिली होती. काही दिवसांनी पीडिता गर्भवती राहिल्यानंतर ही बाब उघड झाली.
२०२०
खून ५८
बलात्कार ८१
फूस लावून पळविणे १७७
२०१९
खून ६१
बलात्कार १००
फूस लावून पळविणे १८८