मृत्यूनंतरही कोरोना वॉरियर शिक्षकाचा परिवार वार्यावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:14 IST2021-07-26T04:14:50+5:302021-07-26T04:14:50+5:30
रावेर : प्राथमिक शिक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू होऊन दोन वर्षे लोटली तरी शासनाच्या अनागोंदी कारभारामुळे कोरोना वॉरियर या शिक्षकाचा ...

मृत्यूनंतरही कोरोना वॉरियर शिक्षकाचा परिवार वार्यावरच
रावेर : प्राथमिक शिक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू होऊन दोन वर्षे लोटली तरी शासनाच्या अनागोंदी कारभारामुळे कोरोना वॉरियर या शिक्षकाचा परिवार वार्यावरच असल्याचे चित्र आहे.
चोरवड येथील मध्य प्रदेश सीमा तपासणी नाक्यावर लॉकडाऊनमधील नाकाबंदीची दि. १५ जुलै २०१९ रोजी सेवा बजावल्यानंतर दि २० जुलै २०१९ रोजी कोरोनाबाधित होऊन डॉ. उल्हासराव पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात औषधोपचार सुरू असताना अजनाड जि. प. प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक अनिल नेहते (५७) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. कोरोना साथरोगात सेवा बजावताना शासकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास ५० लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य शासनाने घोषित केले आहे. असे असताना जि. प. अध्यक्ष रंजना पाटील यांच्या जि. प. गटातील प्राथमिक शिक्षक असलेल्या या कोरोना वॉरियरचा बळी जावून तब्बल दोन वर्षे लोटली तरी, केवळ जळगाव जि. प. प्राथमिक शिक्षण विभाग व ग्रामविकास मंत्रालयाच्या अनागोंदी कारभारामुळे मात्र मयत कोरोना वॉरियर शिक्षकाचे कुटुंब वार्यावर आहे. जि. प. प्राथमिक शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत व नव्याने रुजू झालेल्या जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन प्राधान्याने मयत शिक्षकाच्या कुटुंबीयांना तातडीने अर्थसाहाय्य मिळवून द्यावे, अशी मागणी होत आहे.