आदिवासींना रोजगार, शेतकऱ्यांचा झाला हलका भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:16 IST2021-07-29T04:16:47+5:302021-07-29T04:16:47+5:30
या मजुरांमध्ये युवकांचा सहभाग अधिक असून सध्या जळगाव जिल्ह्यात बागायती पिकांना पाणी भरणे, बैलांच्या सहाय्याने औत हाकणे, फवारणीसाठी, ...

आदिवासींना रोजगार, शेतकऱ्यांचा झाला हलका भार
या मजुरांमध्ये युवकांचा सहभाग अधिक असून सध्या जळगाव जिल्ह्यात बागायती पिकांना पाणी भरणे, बैलांच्या सहाय्याने औत हाकणे, फवारणीसाठी, खते टाकण्यासाठी, सरी ओढण्यासाठी, ऊस लागवडीसाठी सर्वच कामे ही मंडळी करीत असतात तर काही हंगामी मजूर ही जागेवर येऊन शेतकरी या मजुरांना शेतातील कामांसाठी घेऊन जात आहेत. शेतीतील कामे करणे हा एकमेव रोजगार या आदिवासी बांधवांना मिळतो. आदिवासी बांधव ट्रॅक्टर चालवण्यापासून शेतातली मिळेल ती कामे आणि गाई-म्हशींचे दूध काढणे यासह सर्वच कामे करत असतात.
बहुतांश मजूर हे पूर्वी स्थायिक झालेल्या आदिवासींकडे येऊन राहतात आणि मजुरी काम करून उदरनिर्वाह करत आहेत. सध्या आदिवासी भागात रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने सर्व आदिवासी हे गाव आणि शहराकडे वळलेले दिसून येतात.
हजारो आदिवासी कुटुंबांचे गैर आदिवासी गावात बस्तान
दरवर्षी उशिरा होणाऱ्या आदिवासी मजुरांचे रोजगारासाठीचे स्थलांतर यंदा एप्रिल आणि मे महिन्यात सुरू झाले आहे. या स्थलांतरित आदिवासी भागातील मजुरांना एकमेव शेती व्यवसायामुळे रोजगार मिळत असतो.
सालदार म्हणून आहेत आदिवासीच
दरम्यान, तालुक्यातील उत्तरेस असलेल्या अनर नदीकाठावरील महाराष्ट्रातील आणि मध्य प्रदेशातील गावे, पाडे येथून आदिवासी बांधव शहर आणि गावाकडे आले आहेत. गावांमध्ये शेती व्यवसायासाठी संपूर्ण कामे हे सध्या आदिवासी तरुण, युवक आणि महिला यांच्यामुळेच आवरला जात आहे. सध्या गावातील खूप कमी प्रमाणात युवक आता सालदार (घरगडी) म्हणून काम करतात. त्यांची उणीव या आदिवासी तरुण, युवक यांनी भरून काढली आहे. सध्या शेतकरी मजुरांच्या तुटवडा आणि चणचणअभावी शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे. मात्र हा शेती व्यवसाय केवळ आदिवासी बांधवांच्या येण्यामुळे शक्य झालं आहे.
रोजंदारीवरही महिला मजूर
चोपडा तालुक्यातील मोठ्या गावांच्या चौकात दररोज शिरपूर तालुक्यातून रोहिणी भुईटेक, महादेव दोंदवाडे, हिगाव, खामखेडे, धावडी विहीर, जामाण्या पाडा, कालापणी, चिलारे, जोयदा, तर मध्य प्रदेशमधून धवली, देवी दुगानी, वलवाडी आणि चोपडा तालुक्यातील खाऱ्यापाडा, बोरमळी, देव्हारी, देवगिरी, कर्जाने, मेलाने, वैजापूर, उमर्टी, कुंड्यापाणी, मालापुर, मोरचिडा, मुळ्यावतार या गावातून त्यांच्या वाहनातून महिला, तरुण व युवक आदिवासी मजुरांचे टोळके त्यांना जागेवर येऊन शेतकरी कामाचा रोजगार ठरवतात. स्वतःच्या वाहनाने शेतवस्तीवर निवासी ठेवून त्यांच्याकडून शेतीची दैनंदिन कामे करून घेतली जातात. यामध्ये बहुतेक मजुरांचे गटाचे प्रमुख त्यांचे रोजगार ठरवतो तर काही मजूरच कामाच्या नुसार आपला रोजगार ठरवतात. या आदिवासी मजुरांमध्ये बहुतेक शाळकरी मुले व युवक आणि महिला असतात. सोबत लाकूडफाटा किंवा गॅस सिलेंडर, किराणा, धान्य, पोटापाण्याचे साहित्य, अंथरूण, पांघरूण, कपडे घेऊन ही मंडळी रोजगारासाठी आपले गाव सोडून कामाला शहर किंवा मोठ्या गावात शेत वस्तीवर चार ते सहा महिने येत असतात.
280721\28jal_14_28072021_12.jpg
चहार्डी, (ता. चोपडा) येथे वेले रस्त्यालगत झोपड्या करून शेकडो आदिवासी बांधवांच्या जोरावर शेतीव्यवसाय सुरू आहे.