दीडशे घरातील विजेची उपकरणे जळून खाक

By Admin | Updated: June 21, 2014 16:24 IST2014-06-21T16:24:23+5:302014-06-21T16:24:23+5:30

मोहन नगरातील उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांवर डेरेदार वृक्ष उन्मळून पडल्यामुळे दीडशे घरांमध्ये विजेचा उच्च दाब आल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जळून खाक झाल्याची घटना घडली.

Electricity plants in 150 homes burned | दीडशे घरातील विजेची उपकरणे जळून खाक

दीडशे घरातील विजेची उपकरणे जळून खाक

 

 
जळगाव : मोहन नगरातील उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांवर (एल.टी. लाईन) डेरेदार वृक्ष उन्मळून पडल्यामुळे मोहननगरासह रवींद्र नगर, नूतन वर्षा कॉलनीतील दीडशे घरांमध्ये विजेचा उच्च दाब आल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जळून खाक झाल्याची घटना घडली. त्यात लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली.
मोहन नगरात गेल्या काही दिवसांपासून गटारींचे काम सुरू आहे. शुक्रवारी नेहमीप्रमाणे कारागीर खड्डे खोदत होते. त्यात मोहननगरात असलेल्या एका वडाच्या झाडाचे मूळ तोडले गेल्याने हा वृक्ष थेट विद्युत वाहिन्यांवर पडला. त्यामुळे जोरदार स्फोट झाला, अशी माहिती रतनकुमार थोरात यांनी दिली. 
स्फोट झाल्यानंतर रवींद्र नगर, नूतन वर्षा कॉलनी व मोहन नगरात विजेचा उच्च दाब येताच या परिसरातील सुमारे १५0 घरांमधील टीव्ही, फ्रिज, कुलर, इनव्हर्टर, विद्युत दिवे, पंखे, संगणक व लॅपटॉप जळून खाक झाले आहेत. 
ठेकेदार, कारागिरांचे पलायन 
गटारीचे काम सुरू असताना ठेकेदार घटनास्थळी उभा होता. मात्र, वृक्ष पडल्यामुळे नागरिकांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जळण्याची घटना घडल्यानंतर संतप्त नागरिक घराबाहेर पडू लागले. हे चित्र दिसताच ठेकेदार व कारागिरांनी तेथून पलायन केले.
दुपारी ३ वाजता वॉर्डातील नगरसेवक किशोर पाटील घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी त्यांना घेराव घातला. मनपा आयुक्त संजय कापडणीस यांना ताबडतोब बोलवा..झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाली पाहिजे..अशी मागणी त्यांच्याकडे केली. पाटील यांनी स्थानिक नागरिकांना समजविण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. 
जबाबदारी कोणाची?
इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जळून खाक झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी क्रॉम्प्टन कंपनीशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. कर्मचारी घटनास्थळी आले. ठेकेदाराची चूक असल्याचे सांगून 'काडीने औषध लावल्यासारखा' प्रकार करून निघून गेले. यानंतर काही नागरिकांनी मनपा आयुक्त कापडणीस यांच्याशी संपर्क साधला. 
मात्र, त्यांनीही महत्त्वपूर्ण बैठक सुरू असल्याचे सांगून घटनास्थळी येण्याचे टाळले. त्यामुळे जबाबदारी कुणाची? असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे. नगरसेवक किशोर पाटील यांनी वृक्ष उचलण्यासाठी ट्रॅक्टर बोलावूनदेखील 'आयुक्त आल्याशिवाय वृक्ष उचलू देणार नाही' अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतल्यामुळे परिसरात बराच वेळ गोंधळ सुरू होता. या घटनेमुळे या भागातील विज पुरवठा बराच वेळ खंडित होता. 
क्रॉम्प्टन कंपनीचे शहर प्रमुख मुकेश चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की एलटी लाईनवर वृक्ष पडल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जळून खाक झाल्याची घटना घडली. माहिती मिळताच कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. कंपनीने ज्या घरातील वीज मीटर जळून खाक झाले ते बदलवून देण्याची तयारी दर्शविली. मात्र, स्थानिक नागरिकांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची भरपाई कोण देणार? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे कंपनीच्या कर्मचार्‍यांना परत जावे लागले. दरम्यान, येथील विद्युत वाहिन्यांवर वृक्ष सायंकाळपर्यंत पडून असल्यामुळे या परिसरातील विद्युत पुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित होता. 

Web Title: Electricity plants in 150 homes burned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.