चार महिन्यांनंतर खाद्यतेल स्वस्त; खुशाल खा चमचमीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:11 IST2021-06-19T04:11:48+5:302021-06-19T04:11:48+5:30
स्टार - ८२० लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असलेल्या खाद्यतेलाच्या भावात आता घसरण ...

चार महिन्यांनंतर खाद्यतेल स्वस्त; खुशाल खा चमचमीत!
स्टार - ८२०
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असलेल्या खाद्यतेलाच्या भावात आता घसरण झाली असून, यामुळे गृहिनींना मोठा दिलासा मिळाला आहे. शेंगदाणा, सोयाबीन तेलात २० रुपये प्रति किलोने घसरण झाली आहे. आता केंद्र सरकारने तेलाची मोठ्या प्रमाणात आयात केल्याने तेलाचे भाव कमी होण्यास मदत होत आहे.
प्रत्येक घरातील तसेच खाद्य पदार्थांच्या व्यवसायातील अविभाज्य घटक असलेल्या तेलाचे भाव वाढल्यास त्याचा मोठा परिणाम स्वयंपाकघराच्या ‘बजेट’वर होत असतो. चार ते पाच महिन्यांपासून खाद्य तेलाच्या भावात मोठी वाढ होत गेली. एकतर अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे झालेले नुकसान तसेत शेंगदाण्याची वाढलेली निर्यात यामुळे तेलाचे भाव वाढत होते.
दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना तेलाची खरेदी करणेही अवघड झाले होते. बाजारातील तेलाची मागणी पाहता केंद्र सरकारने तेल आयात करण्याचा निर्णय घेतला. यानंतर तेलाचे दर कमी झाले. सोयाबीन, शेंगदाणा, सूर्यफूल, पाम तेल, तीळ तेल यांच्या किमती प्रति किलो १५ ते २० रुपयांनी कमी झाल्या आहेत.
आता गृहिणींना घरी पंचपक्वान्न बनविताना लागणारे अतिरिक्त तेल सहज खरेदी करता येणार आहे. पूर्वीच्या तुलनेत तेलाचे दर जास्त असले तरी अलीकडे वाढलेल्या दरापेक्षा कमी झाले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. बाजारपेठेत तेलाची मागणी वाढली आहे.
गृहिणींचे बजेट कोलमडले
तेलाच्या किमती चार महिन्यांनंतर काही प्रमाणात कमी झाल्या. मात्र, वर्षभराची तुलना पाहता हे भाव जास्तच आहेत. तेलाच्या वाढत्या किमतींनी गृहिणींना इतर वस्तू खरेदी करताना काहीसी कपात करावी लागली. यातून वस्तू खरेदीवर परिणाम झाला आहे. तेलाच्या खरेदीवर एकूण नियोजनापैकी ३० टक्के रक्कम खर्च होत होती. यामध्ये थोडीफार घसरण झाली आहे.
तेलबियांना मागणी असल्याने त्यांची लागवड केली जात होती. यामध्ये शेंगदाणा, सोयाबीन, तीळ, करडई यांची लागवड होत होती. मात्र आता तेलबियांना फारशी मागणी नाही. तसेच त्याला पाहिजे तसा भावही मिळत नाही. परिणामी, तेलबियांतून तयार होणारे घाण्यातील तेल काढणेही बंद केले.
- विठ्ठल पाटील, शेतकरी
पूर्वी तेलबियांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत चांगला भाव मिळण्यासह मागणी असायची. आता पाहिजे तसा भाव मिळत नाही. त्यामुळे त्यांची लागवड होत नाही. त्यामुळे घाण्यावरून तेल काढून घेणेही बंद झाले.
- कपिल चौधरी, शेतकरी
तेलाचे भाव
तेल - पूर्वी - आता
सोयाबीन तेल - १६५ - १४५
शेंगदाणा तेल - १९० - १७०
सूर्यफूल तेल - १७५ - १६०
पाम तेल - १५० - १२८
तीळ तेल - २०० - २००