रस्त्यांच्या राजकारणात आरोपांचा धुरळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:19 IST2021-08-23T04:19:27+5:302021-08-23T04:19:27+5:30

( डमी १०७९) अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात सुरू असलेल्या महामार्गाच्या कामांसह शहरातील रखडलेल्या रस्त्यांच्या प्रश्नावर ...

The dust of accusations in street politics | रस्त्यांच्या राजकारणात आरोपांचा धुरळा

रस्त्यांच्या राजकारणात आरोपांचा धुरळा

( डमी १०७९)

अजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात सुरू असलेल्या महामार्गाच्या कामांसह शहरातील रखडलेल्या रस्त्यांच्या प्रश्नावर अनेक वर्षांपासून केवळ राजकीय आरोपांचा धुरळा उडत आहे. वर्षानुवर्षे रस्त्यांची कामे सुरू आहेत. बहुतांश कामांना अनेक अडचणी येत आहेत. यामुळे नागरिकांना मात्र त्रासाला सामोरे जावे लागत आहे. औरंगाबाद रस्त्याचे काम असो वा सुरतकडून येणाऱ्या रस्त्याचे काम असो, सर्वच कामे संथगतीने सुरू असून, जिल्ह्यातील राजकारणी मात्र हे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न न करता केवळ राजकीय आरोप - प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठवून महामार्गाची अनेक कामे केवळ पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळे होत नसल्याचे सांगत, याकडे लक्ष देण्याचा सूचना दिल्या होत्या. याच मुद्द्यावरून आता जिल्ह्यातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्यांच्या कामांचा प्रश्न आता समोर येत आहे. औरंगाबाद, धुळे, जळगाव बायपास व शहरात येणाऱ्या रस्त्यांची स्थिती अतिशय बिकट झाली आहे. अनेक वर्षांपासून हे काम पूर्ण होताना दिसून येत नाही.

औरंगाबाद - जळगाव

गेल्या चार वर्षांपासून औरंगाबाद - जळगाव महामार्गाचे काम सुरू आहे. आतापर्यंत ९० टक्के काम पूर्ण झाले असल्याचे महामार्ग प्राधिकरणकडून सांगण्यात येत आहे. जळगाव शहरातील एमआयडीसीपर्यंत हे काम पूर्ण झाले असले तरी महामार्गादरम्यान असलेल्या मोऱ्यांचे काम पूर्ण झालेले नाही.

धुळे - जळगाव

जळगाव - धुळे दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यात २०१७ मध्ये कामाला गती आली होती. मात्र, त्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून कोरोनामुळे हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी खोदकाम झाल्यामुळे वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

जळगाव - भुसावळ

भुसावळकडून येणाऱ्या महामार्गाचे काम काही वर्षात चांगल्या गतीने पूर्ण झाले आहे. तरसोद - फागणे या रस्त्याचे काम अत्यंत गतिमान पध्दतीने झाल्यामुळे वाहनधारकांना सोयीचे ठरले आहे. मात्र, जळगाव शहरातून होत असलेले चौपदीकरणाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. हे काम वेगाने करण्याची गरज आहे.

जळगाव बायपास

धुळ्याकडून येणाऱ्या महामार्गांतर्गत पाळधी ते तरसोददरम्यान २३ किमीच्या बायपासचे काम सुरू आहे. चार वर्षांपूर्वीच या कामाला सुरुवात झाली होती. मात्र, २०१८ ते २०१९ दरम्यान हे काम थंडबस्त्यात होते. मात्र, गेल्या वर्षभरात या कामाला गती आली आहे. तसेच गिरणा पुलालादेखील सुरुवात झाली आहे.

कोट...

रस्त्यांच्या कामांमध्ये काही तांत्रिक अडचणी येत असतात. मात्र, यामध्ये प्रत्येक राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी याबाबी समजून घेणे गरजेचे आहे. फागणे ते तरसोदपर्यंतचे काम वेगात सुरू आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल.

-सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष, भाजप

अनेक वर्षांपासून महामार्गांचे काम संथगतीने सुरू आहे. भुसावळकडून येणाऱ्या रस्त्यांचे काम ज्या पध्दतीने गतिमानतेने झाले, त्याच पध्दतीने इतर कामे होणे गरजेचे आहे. याबाबत शासनाकडे पाठपुरावा कायम आहे.

-विष्णू भंगाळे, जिल्हाध्यक्ष, शिवसेना

Web Title: The dust of accusations in street politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.