वाहने बंद पडल्याने कोंडी
By Admin | Updated: May 20, 2014 01:19 IST2014-05-20T01:19:51+5:302014-05-20T01:19:51+5:30
बांभोरी पूल व अजिंठा चौफुली : साडे चार तास खोळंबा

वाहने बंद पडल्याने कोंडी
जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील बांभोरी पुलावर सोमवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास तीन वाहने एकाच वेळी बंद पडल्याने तब्बल तीन तास वाहतुकीचा खोळंबा झाला. ही वाहतूक सुरळीत झाल्यानंतर एकाच वेळी वाहने निघाल्याने पुन्हा अजिंठा चौफुलीजवळ दीड तास रहदारी अडकून पडली. वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचार्यांच्या तत्परतेमुळे काही वेळेनंतर वाहतूक सुरळीत झाली मात्र वाहनधारक व प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. राष्ट्रीय महामार्गावरील बांभोरी पुलावरून सोमवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास एमएच ३४ वाय १५३४ हा खताने भरलेला ट्रक धुळ्याकडे जात होता. ट्रकच्या खालच्या बाजूचा रॉड अचानक तुटल्याने ट्रक बांभोरी पुलाच्या मधोमध अडकून पडला. या दरम्यान दुसर्या बाजूने जाणार्या वाहनधारकांची पुढे जाण्यासाठी घाई सुरू झाल्याने रहदारीचा खोळंबा झाला. या ठिकाणची रहदारी सुरळीत होत असताना बांभोरीकडून जळगावकडे येत असलेली एमएच १९ वाय २०२६ या प्रवासी वाहतूक करणार्या कालीपिलीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने अचानक बंद पडली. पुलाच्या शेवटच्या टोकावर ही कालीपिली बंद पडल्याने चालकाने तिला दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहन सुरू होत नसल्याने अनेक वाहनांची अडचण झाली. त्यातच जळगावकडून धुळ्याकडे जात असलेली एमएच ०४ बीएस ८१४ ही कार अचानक बंद पडली. एकाच वेळी तीन वाहने बंद पडल्यामुळे दोन्ही बाजूच्या रहदारीचा खोळंबा झाला. इकडे बांभोरी गावाच्या पुढे वाहनांची रांग लागून होती. तर दुसर्या बाजूला खोटे नगरपर्यंत रांग लागून होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर वाहतूक शाखेचे रामकृष्ण भोसले, राज्य महामार्ग विभागाचे उपनिरीक्षक अशोक कळमकर, तालुका पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक आधार निकुंभे हे कर्मचार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी एका-एका बाजूच्या वाहनांना पुढे काढत रहदारी सुरळीत केली. बंद कारला पोलीस तसेच वाहनधारकांनी मागून धक्का देत बाहेर काढले. क्रेनच्या मदतीने काढला ट्रक वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी क्रेन मागवित हा ट्रक बाजूला काढला. या ट्रकमध्ये खत भरलेले असल्याचे उपनिरीक्षक कळमकर यांनी सांगितले.