जळगावातील नेत्यांना कात्री लावा, मग पहा ‘राष्ट्रवादी’ कशी वाढते
By Admin | Updated: June 1, 2017 13:30 IST2017-06-01T11:11:45+5:302017-06-01T13:30:01+5:30
फलकाने खळबळ : ‘राष्ट्रवादी’मध्ये कलह वाढला

जळगावातील नेत्यांना कात्री लावा, मग पहा ‘राष्ट्रवादी’ कशी वाढते
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.1- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना पक्षातून कात्री लावा, मग पहा जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा वाढतो, अशा आशयाचा संदेश लिहिलेल्या व राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिका:यांचे छायाचित्र असलेला फलक अजिंठा विश्रामगृहाच्या भिंतीनजीक बुधवारी लागल्याने शहरात खळबळ उडाली.
29 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शहरात अजिंठा विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत बैठक घेतली होती. पवार हे चोपडा येथे अरुणभाई गुजराथी यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर शहरात दाखल झाले. जवळपास अर्धातास त्यांनी ज्येष्ठ नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत माजी खासदार ईश्वरलाल जैन, अॅड.वसंतराव मोरे, डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, अॅड.रवींद्र पाटील, अनिल भाईदास पाटील, मनीष जैन व इतर नेते, पदाधिकारीही सहभागी झाले होते.
चौधरींची पत्रपरिषदेत फटकेबाजी
या बैठकीत मनोज चौधरींचा मुद्या काही नेत्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर चौधरी यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांचे खंडन करण्यासाठी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात अॅड.वसंतराव मोरे यांनी आपला महाफेडचा आलेख तपासावा, मग इतरांवर मॅनेज झाल्याचे आरोप करावेत, असे चौधरी म्हटले होते. तसेच चौधरी यांनी आपल्यासाठी शरद पवार व अजित पवार हे श्रद्धास्थान आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून आपण चुकीचे आरोप करणारे नेते, माजी खासदार ईश्वरलाल जैन व मनीष जैन यांचे पितळ उघडे करू, असे चौधरी म्हटले होते. त्यानंतर बुधवारी हा फलक लावण्यात आला आहे.
दरम्यान, या फलकाबाबत महापालिकेची परवानगी घेतली आहे का? याची किरकोळ वसुली विभागाला विचारणा केली असता, त्यांनी या दोन दिवसात एकाही फलकाबाबत कोणीच परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट केले.