नवरा नकोच, प्रियकरच हवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:57 IST2021-02-05T05:57:18+5:302021-02-05T05:57:18+5:30
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहूर येथील २६ वर्षीय महिलेचे याच गावाच्या शेजारी सहा कि.मी. अंतरावर असलेल्या एका खेडेगावातील २४ वर्षीय ...

नवरा नकोच, प्रियकरच हवा !
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहूर येथील २६ वर्षीय महिलेचे याच गावाच्या शेजारी सहा कि.मी. अंतरावर असलेल्या एका खेडेगावातील २४ वर्षीय अविवाहित तरुणासोबत लॉकडाऊन काळात सूत जुळले. दोघांचे प्रेम इतके बहरले की, त्यांनी पलायन करून संसार थाटण्याचा निर्णय घेतला. १९ जानेवारी रोजी महिला पहूर येथून जळगावात आली, तर तरुण आधीच येथे थांबलेला होता. बसने दोघांनी थेट नाशिक गाठले. तरुणाने दोन महिने आधीच नाशिकमध्ये कंपनीत कामाची व्यवस्था व राहायला भाड्याने घर घेऊन ठेवले होते. तेथे ते संसाराला लागलेले असतानाच दुसरीकडे पत्नी घरी नाही म्हणून पती, तिची मुले हैराण झाली. त्यांनी पहूर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद केली. तेथून प्रकरण पुढे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याकडे आले. उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, सहायक फौजदार विजय पाटील, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारुळे व संदीप सावळे यांनी विवाहितेचा छडा लावला. पहूरचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी उपनिरीक्षक अमोल देहडे व शशिकांत पाटील यांचे पथक तातडीने रवाना केले. सोमवारी या पथकाने विवाहितेला शोधून काढले असता पोलिसांनाही धक्का बसला. तिने तिच्यापेक्षाही वयाने लहान असलेल्या अविवाहित तरुणासोबत संसार थाटला होता. पतीच्या घरी येण्यास विवाहितेने स्पष्ट नकार दिला. कारण विचारले तर पती सतत दारू पितो व मारहाण करतो म्हणून तो नकोच, असा पवित्रा घेऊन मुलांचाही तिने त्याग केला. त्यामुळे तिचा जबाब घेऊन पोलीस माघारी फिरले.