दुषीत पाण्याचा शोध लागेना
By Admin | Updated: May 12, 2014 18:58 IST2014-05-12T18:58:33+5:302014-05-12T18:58:33+5:30
शहरातील आझादनगर परिसरातील अन्सारनगर, दिलदारनगर, अकबर चौक, मौलवीगंज, चांदतारा चौक, अल्लामा इकबाल चौक, हजारखोली व कबीरगंज आदी भागासह शहरातील विविध भागामध्ये अतिसाराची लागण मोठया प्रमाणावर झाली आहे.

दुषीत पाण्याचा शोध लागेना
धुळे : शहरातील आझादनगर परिसरातील अन्सारनगर, दिलदारनगर, अकबर चौक, मौलवीगंज, चांदतारा चौक, अल्लामा इकबाल चौक, हजारखोली व कबीरगंज आदी भागासह शहरातील विविध भागामध्ये अतिसाराची लागण मोठया प्रमाणावर झाली आहे. याबाबत मनपाच्या पाणीपुरवठा व आरोग्य विभागाने परिसराचे सर्वेक्षण केले. अतिसार पाण्यापासून झालेला आहे हे निश्चित. मात्र कोणत्या पाण्यामुळे याचा ठाव अद्याप लागलेला नाही. पाणीपुरवठा आणि आरोग्य विभागाचा याबाबतचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. मात्र संबंधित अधिकार्यांशी आपली चर्चा झाल्याचे आयुक्त दौलतखाँ पठाण यांनी सांगितले. सर्वेक्षणाअंती काही ठिकाणांवर जलवाहिनी दुरूस्तीचे काम करत गळती काढण्यात आली. मनपा आरोग्य विभागाचे डॉ. अविनाश पाटील यांच्यासह पथक आणि आशा स्वंयसेविकांना या परिसरातील प्रत्येक घराचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. खबरदारी म्हणून क्लोरीनच्या गोळ्या वाटप केल्या जात असल्याचे पठाण यांनी सांगितले. आरोग्य विभागाचे पथक या परिसरातील प्रत्येक घरात जावून सर्वेक्षण करत असून स्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. ज्या गल्लीतील लोकांना अधिक त्रास होत आहे. ती दाटीवाटीच्या वस्तीतील गल्ली आहे. दोन दिवसांपुर्वी एका ठिकाणी त्यांनी सामुहिक भोजन केल्यामुळे त्यांना त्रास उद्भवल्याचे पठाण यांनी सांगितले. मात्र जिल्हा रूग्णालयाने यापुर्वीच पाण्यापासून अतिसाराची लागण झाल्याचे स्पष्ट केले आहे. पाणीपुरवठा विभागाचे औव्हरसियर सी. एम. ओगले यांनी आठ दिवसांपासून या परिसरात महापालिकेतर्फे पाणीपुरवठा झाला नसल्याचे सांगितले. या कालावधीत काही बोअरवेल तसेच विहीरींवरून परिसरातील नागरिकांनी पाणी आणून वापरले आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या पाण्यापासून त्यांना बाधा झाली हे सांगणे कठिण असल्याचे ते ‘लोकमत’शी बोलतांना म्हणाले.