क्षणिक फायद्यासाठी स्वत: आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:18 IST2021-01-19T04:18:50+5:302021-01-19T04:18:50+5:30
जळगाव : रस्ता खराब आहे, म्हणून त्याचा जाब विचारत बसू नका, ते एका दिवसाचे काम नाही. आधी हेल्मेटचा वापर ...

क्षणिक फायद्यासाठी स्वत: आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका
जळगाव : रस्ता खराब आहे, म्हणून त्याचा जाब विचारत बसू नका, ते एका दिवसाचे काम नाही. आधी हेल्मेटचा वापर कराच. एखाद्या ठिकाणी लवकर पोहचायचे म्हणून नियमांचे उल्लंघन किंवा भरधाव वेगाने वाहने चालविणे, दुचाकीवर विना हेल्मेट व तीन सीट प्रवास करणे हे क्षणिक सुख असून त्यासाठी स्वत:चा व इतरांचा जीव धोक्यात घालू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाच्या शुभारंभप्रसंगी केले.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय व शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारपासून जिल्ह्यात रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. अल्पबचत सभागृहात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करुन उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, मनपा आयुक्त सतीश कुळकर्णी, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक (नही) चंद्रकांत सिन्हा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोजीराव चव्हाण व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही उपस्थित होते.
रस्ता खोदला तर गुन्हे दाखल करणार : डॉ.मुंढे
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांची स्थिती जिल्ह्यात चांगली असल्याने वाहने वेगाने चालतात व मध्येच शेतकरी रस्ता खोदून ठेवत असून त्यामुळे त्याच ठिकाणी अपघात होत असल्याचे बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर असे प्रकार होत असतील तर संबंधित लोकांविरुध्द आम्ही गुन्हे दाखल करु, असे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी सांगितले, त्याच बरोबर शहरात मनपा क्षेत्रात आयुक्तांनी दंडात्मक कारवाई करावी असेही त्यांनी सूचविले. कर वसुली अधिकारी चंद्रशेखर इंगळे यांनी आभार मानले.
निरीक्षकांनी पथनाट्य सादर करुन वेधले लक्ष
परिविक्षाधीन मोटार वाहन निरीक्षकांनी आवारात विमा हेल्मेट व तीन सीट दुचाकी चालविण्याचे धोके यावर दोन पथनाट्य सादर केले. साक्षात यमराज कशी मृत्यूची वाट बघतो व मानवी चुका काय असतात, त्या सुधारण्याचे आपल्याच हातात असते असे यातून पटवून देण्यात आले. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी अधिकाऱ्यांचे कौतूक केले.