नेरी व खरजई पाणी योजनांवरून मतभेद
By Admin | Updated: June 6, 2014 13:54 IST2014-06-06T13:54:48+5:302014-06-06T13:54:48+5:30
सामूहिक पाणी योजनांतर्गत असलेल्या गावांमध्ये स्वतंत्र पाणी योजना राबविण्याच्या विषयावरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीअधिकारी आणि अध्यक्ष यांच्यातील मतभेद सर्वसाधारण सभेत उघड झाले.

नेरी व खरजई पाणी योजनांवरून मतभेद
>सभेत फडकला 'लोकमत'
जळगाव : नेरी ता.जामनेर आणि खरजई ता.चाळीसगाव या सामूहिक पाणी योजनांतर्गत असलेल्या गावांमध्ये स्वतंत्र पाणी योजना राबविण्याच्या विषयावरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीअधिकारी आणि जि.प. अध्यक्ष यांच्यातील मतभेद सर्वसाधारण सभेत उघड झाले.
सभेच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष दिलीप खोडपे होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील, सभापती लीलाबाई सोनवणे, कांताबाई मराठे, राजेंद्र राठोड, सीईओ शीतल उगले, अतिरिक्त सीईओ सुनील गायकवाड, सभा सचिव मिनल कुटे उपस्थित होत्या.
नेरी व खरजई सामूहिक पाणी योजनांचा लाभ घेत असलेल्या गावांमध्ये स्वतंत्र पाणी योजनांच्या विषयाला सदस्यांनी स्पष्ट विरोध न करता स्वतंत्र पाणी योजना या अयशस्वी ठरल्याची उदाहरणे दिली.
प्रशासनाच्या प्रमुख म्हणून सीईओ यांनी या योजनांसंबंधी दिलेल्या अभिप्रायाबाबत सांगितले. त्या म्हणाल्या, ज्या गावांमध्ये सामूहिक पाणी योजना आहेत तेथे स्वतंत्र पाणी योजना घेऊन पैशांची उधळपट्टी करायला नको. परंतु जेथे खरोखरच गरज आहे तेथे स्वतंत्र पाणी योजना व्हाव्यात. ज्या गावांमधील स्वतंत्र पाणी योजनांना पाण्याचा स्त्रोत नाही त्या गावांसाठी सामूहिक पाणी योजनाच योग्य असल्याचा स्पष्ट अभिप्राय दिल्याचे त्या म्हणाल्या.
अर्थातच नेरी व खरजई पाणी योजनांचा विषय अध्यक्ष खोडपे यांच्या संमतीने सभागृहात आला होता. विशेष म्हणजे नेरी हे खोडपे यांचे गाव आहे. सदस्यांनी नेरी सामूहिक पाणी योजनेंतर्गत असलेल्या गावांमध्ये स्वतंत्र पाणी योजना राबविण्यास मंजुरी दिली. पण खरजई योजनेंतर्गत फक्त वडाळा वडाळी या गावात स्वतंत्र योजना घेण्यास मंजुरी दिली गेली. इतर गावांमध्ये सर्वेक्षणानंतर स्वतंत्र पाणी योजना देण्याचा निर्णय झाला.
खडसेंचा दबाव आणू नका
नदी संवर्धन योजनेंतर्गत वाघोदा बुद्रूक ता.रावेर येथे चार कोटी १९ लाख रुपयांच्या कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी घेतली जात असेल तर प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकारही जि.प.लाच द्या. या विषयासंबंधी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांचे नाव विषय सूचित टाकल्याची बाब चुकीची असल्याचे शिवसेनेचे प्रकाश सोमवंशी म्हणाले. त्यांचे नाव टाकून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे का? असा प्रश्न त्यांनी केला. या योजनेसंबंधी अटीनुसार ३0 टक्के निधी ग्रा.पं.नेच द्यावा. ग्रा.पं. ने निधी नाही दिला तर सेस फंडातून निधी देण्याची तरतूद होऊ नये.तसेच फक्त इतर गावांमध्येही अशी योजना आणावी, अशी मागणी करण्यात आली. लोकमतचा आधार घेऊन आपले मुद्दे मांडताना सदस्य प्रकाशसोमवंशी.