विद्यार्थी शिक्षणापासून वंचित;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:17 IST2021-09-03T04:17:17+5:302021-09-03T04:17:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. परिणामी, ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांकडे ...

विद्यार्थी शिक्षणापासून वंचित;
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. परिणामी, ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन सुविधा नसल्यामुळे ते विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे तात्काळ राज्यातील शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्यावतीने मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याशिवाय मासूने शाळा सुरू करण्यासंदर्भात पर्यायही सुचविले आहेत.
कोरोना विषाणूने हाहाकार माजविल्यानंतर गत वर्षापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. केवळ कोरोनामुक्त गावांमधील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू असून दुसरीकडे शहरातील शाळा, महाविद्यालये अजूनही उघडलेली नाहीत. दरम्यान, ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन सुविधा नाही. परिणामी, या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. वर्षभरापासून विद्यार्थीसुध्दा घरात राहून कंटाळले आहेत. जर शिक्षण व्यवस्था अशीच बंद राहिली तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागेल. अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शाळासुध्दा सुरू व्हाव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
असे सुचविले पर्याय़..
- शाळा व महाविद्यालयातील एका वर्गात शंभर टक्के हजेरीपट असेल तर सकाळ सत्रामध्ये पन्नास टक्के विद्यार्थ्यांना बोलविण्यात यावे तर दुपारच्या सत्रात निम्म्या विद्यार्थ्यांना बोलविण्यात यावे.
- शाळा आणि महाविद्यालयामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून लसीकरण मोहिमेला सुरुवात करावी. जेणेकरून हळूहळू लसीकरणाचा टप्पा गाठून शाळा व महाविद्यालये १ डिसेंबरपासून पूर्णपणे सुरू करू शकतो.
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या रुग्णसंख्येतही घट झाली आहे. त्यामुळे शाळा व महाविद्यालयांना कोरोनाचे सर्व नियम पाळून महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर यावर उपाय काढून शाळा व महाविद्यालय त्वरित सुुरू करावीत. अन्यथा मासू सरकारविरोधात न्यायासाठी बंड पुकारून रस्त्यावर उतरेल, असा इशारा देण्यात आला आहे.