पीक विमा योजनेचा घोळ
By Admin | Updated: July 18, 2014 12:41 IST2014-07-18T12:41:30+5:302014-07-18T12:41:30+5:30
हवामानावर आधारित कृषी पीक विमा योजनेत किती लाभार्थी झाले याची नेमकी माहिती कृषी विभागाकडे नसतानाच जुनी कृषी पीक विमा योजना सुधारितरीत्या लागू करण्याचा धडाका सुरू झाला आहे.

पीक विमा योजनेचा घोळ
जळगाव : हवामानावर आधारित कृषी पीक विमा योजनेत किती लाभार्थी झाले याची नेमकी माहिती कृषी विभागाकडे नसतानाच जुनी कृषी पीक विमा योजना सुधारितरीत्या लागू करण्याचा धडाका सुरू झाला आहे.
अर्थातच सुधारित कृषी पीक विमा योजनेबाबत नेमक्या मार्गदर्शक सूचना अद्यापही कृषी विभागाला प्राप्त झालेल्या नाहीत. यामुळे विमा काढण्यासाठी इच्छुक शेतकरी व कर्जदार शेतकरी यांना वणवण करावी लागत आहे.
या खरीप हंगामात प्रथमच हवामानावर आधारित कृषी पीक विमा योजना लागू केली. त्यात कापूस, उडीद, मूग, ज्वारी या पिकांचा समावेश होता. या योजनेतून बिगर कर्जदार असलेल्या सुमारे १0 हजार शेतकर्यांनी विमा काढून घेतला आहे. परंतु कर्जदार शेतकर्यांचा विमा काढला की नाही याची नेमकी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी विभागाकडे नाही.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किसन मुळे यांना विचारले असता हवामानावर आधारित कृषी पीक विमा योजनेतून अनेक शेतकर्यांनी विमा काढला आहे. पण त्याची आकडेवारी बँकांकडून अद्याप मिळालेली नाही. बँकांनी मात्र बिगर कर्जदार व कर्जदार शेतकर्यांच्या पिकांचा विमा काढण्यास चालढकल केली.
जिल्हा बँकेत हा प्रकार अधिक झाला. वरिष्ठ कार्यालयातून आदेशच नसल्याचे तालुका व ग्रामीण पातळीवरील जिल्हा बँकांच्या शाखांमधून कर्जदार व बिगर कर्जदार शेतकर्यांना सांगितले गेले. यामुळे किती कर्जदार शेतकरी हवामानावर आधारित कृषी पीक विमा योजनेचे लाभार्थी बनतील? हा प्रश्नच आहे. या स्थितीत शेतकर्यांनी जावे कुठे? हा प्रश्न आहे.
योजनेच्या नावाखाली फक्त धूळफेक करण्यात आल्याचा आरोपही शेतकरी करीत आहेत.
मार्गदर्शक सूचना नाहीत
कुठल्या पिकासाठी किती हप्ता, कोणत्या व कशा कालावधीत विमा संरक्षण मिळेल यासंदर्भात अजून मार्गदर्शक सूचना आलेल्या नसल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे सांगण्यात आले. सुधारित योजनेचे घोंगडे भिजत या हंगामात सुधारित कृषी पीक विमा योजनेतून जिल्ह्याला वगळले होते. परंतु हवामानावर आधारित पीक विमा योजनेची मुदत ३0 जून रोजी संपताच ही योजना जिल्ह्यासाठी लागू करण्यात आली. ३0 जुलैपर्यंत या योजनेची मुदत आहे. बँकांमध्ये विमा काढला जाईल. परंतु या योजनेच्या मार्गदर्शक सूचना गुरुवारपर्यंत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या नव्हत्या. भात, कापूस, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, उडीद व मूग या पिकांसाठी सुधारित कृषी पीक विमा योजना लागू केली जाणार असल्याची माहिती मिळाली. परिसरात कृषी पीक विमा काढण्यासाठी अनेक शेतकरी इच्छुक आहेत. परंतु त्यांना विमा काढण्यासाठी बँका, कृषी विभाग यांच्याकडे वणवण करावी लागत आहे. हवामानावर आधारित कृषी पीक विमा योजनेची मुदत संपलेली आहे. पण याची नेमकी माहिती शेतकर्यांना मिळालेली नाही. कुठलाही प्रचार झाला नाही. आता सुधारित कृषी पीक विमा योजना आणली आहे, परंतु या योजनेबाबतही शेतकर्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. बँकांमध्ये अधिकारी परतवून लावतात.