दुबार पेरणीचे संकट

By Admin | Updated: June 21, 2014 16:16 IST2014-06-21T16:16:19+5:302014-06-21T16:16:19+5:30

अद्याप पेरणीलायक पाऊस न झाल्याने खते, बियाण्याचा बाजार ठप्प झाला आहे. अन्नधान्याचे दर मात्र अजून स्थिर आहेत. जिल्ह्यातील काही शेतकर्‍यांवर दुबारपेरणीचे संकट ओढविले आहे.

The crisis of drought sowing | दुबार पेरणीचे संकट

दुबार पेरणीचे संकट

जळगाव : अद्याप पेरणीलायक पाऊस न झाल्याने खते, बियाण्याचा बाजार ठप्प झाला आहे. अन्नधान्याचे दर मात्र अजून स्थिर आहेत. जिल्ह्यातील काही शेतकर्‍यांवर दुबारपेरणीचे संकट ओढविले आहे.

शहरात दोन दिवसाआड २६00 मे.टन खते येतात. ती लागलीच वितरकांकडून गाव पातळीवरील किरकोळ विक्रेत्यांकडे पोहोचतात. अर्थातच आठवड्याला चार कोटी रुपयांची होणारी खत बाजारातील उलाढाल आजघडीला थांबली आहे. 
कापूस वाचविण्याची धडपड
जामनेर, बोदवड, चाळीसगाव, भडगाव, पारोळा भागात अनेक विहिरी, कूपनलिकांचे पाणी उन्हाळ्य़ाच्या अखेरीस कमी होऊ लागते. जूनपर्यंत तर बिकट स्थिती असते. या भागात लागवड केलेल्या पूर्वहंगामी (बागायती) कापसाला वाचविण्याचे आव्हान सध्या आहे. 
जिल्हाभरात या हंगामात चार लाख ४१ हजार हेक्टरवर कापसाची लागवड होण्याचे संकेत होते. आतापर्यंत २३ हजार हेक्टरवर क्षेत्रात पूर्वहंगामी कापसाची लागवड झाली आहे. या कापसालादेखील पावसाची गरज आहे. 
रोपे पिवळी पडण्याचे प्रकार
पाऊस नसल्याने पूर्वहंगामी कापूस उभारीवर नाही. चोपडा, यावल, जळगाव भागात पूर्वहंगामी कापसातील काही रोपे पिवळसर होऊन त्यांची वाढ खुंटत आहे. अतिउष्णतेमुळे या रोपांना बाधा पोहोचत असल्याचे संशोधक भूषण पाटील म्हणाले. 
हंगामी म्हणजेच कोरडवाहू कापसाची लागवड अजून झालेली नाही. जुलैच्या मध्यापर्यंत लागवड करणे योग्य असते. यापुढे पाऊस किती ताण देतो आणि कापूस लागवड होते की नाही? अशी भीती आहे. 
उत्पादकता अशक्य
एकूण सात लाख ७८ हजार हेक्टरवर कापसासह तृणधान्य, कडधान्य, तेलबिया पिकांची लागवड करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. 
या पिकांची उत्पादकता गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक राहील, असे भाकीत करण्यात आले होते. त्यात ज्वारीची हेक्टरी २0 क्विंटल, मका ३५, उडीद हेक्टरी २0, मूग १२, सोयाबीन १६, तूर १५, कापूस ३00 किलो रुई, अशी उत्पादकता राहील, असे कृषी विभागाने म्हटले होते. पण मान्सून उशिराने येण्याची स्थिती असल्याने ही उत्पादकता गाठणे आता कठीण होत आहे. याचा अर्थ उत्पादनामध्ये मोठी घट येण्याची शक्यता आहे. 
साठा करण्याची तयारी 
पाऊस जसजसा लांबत आहे तसे धान्य बाजारातील गणितेही चुकत आहेत. सद्य:स्थितीमध्ये व्यापार्‍यांनी साठा करण्याची तयारी केली आहे. माल मागविणे आणि लागलीच तो विक्री करणे ही प्रक्रिया मंद होत आहे. माल मागविण्याचे प्रमाण कमी आहे. जी व्यापारी मंडळी माल मागवित आहे ती त्याचा काही प्रमाणात साठाही करू लागली आहे. तूर्त धान्य बाजारात हवी तेवढी तेजी नाही. बाजार स्थिर आहे. हरभरा, तूर, उडीद, तूर डाळी, गव्हाचे दर स्थिर आहेत. आठवडाभरात पाऊस यायला हवा. अन्यथा पुढे अन्नधान्याचे दर वाढू शकतात, असे दाणा बाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया म्हणाले. 
दुबार पेरणीचे सावट
चाळीसगाव, धरणगाव, अमळनेर, जळगाव या तालुक्यांमध्ये सोयाबीन, कापूस या पिकांची अल्प पावसाच्या आधारावर पेरणी व लागवड करण्यात आली. त्यावर पाऊस नाही. कमी पावसामुळे कोंब करपून बियाणे वाया जाईल. यामुळे दुबार पेरणी करावी लागेल. धूळ पेरणीदेखील झाली होती. तीदेखील यशस्वी झालेली नाही. धूळ पेरणी व अल्प पावसाच्या आधारावर झालेल्या पेरणीखाली १७00 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र आहे. दुबार पेरणीसाठी बियाण्याची गरज पडेल. सोयाबीन, मूग व उडीदाच्या बियाण्याची गरज असेल. यामुळे हे बियाणे अधिक प्रमाणात मागविण्याची तयारी कृषी विभागाने केली आहे.
खते घेण्यासाठी शेतकर्‍यांना रांगा लावण्याची वेळ आली होती. काळाबाजारही झाला होता. पण पाऊस लांबत असल्याने खत बाजारात शुकशुकाट आहे. उधारीवर खते देण्याची वेळ कंपन्यांवर आली आहे. तर मोठय़ा शेतकर्‍यांना दुकानदारही उधारीने खते देत आहेत.
 डाळींचे दर 
(दर प्रतिक्विंटल रुपयात)
हरभरा- ३000 ते ३६00
मूग- ८000 ते ८५00
उडीद- ६७00 ते ७१00
तूर- ६000 ते ६४00
 
तांदूळ व गव्हाचे दर 
(दर प्रतिक्विंटल रुपयात)
चिनोर- ३000 ते ३२00
कालिमूछ- ३८00 ते ४000
बासमती- १२000 ते १६000
गहू- १९00 ते २000 

Web Title: The crisis of drought sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.