गुन्हेगारांचा जोर, पोलीस कमजोर
By Admin | Updated: June 30, 2014 14:08 IST2014-06-30T14:08:07+5:302014-06-30T14:08:07+5:30
काही वर्षांपूर्वी पोलीस दादाचा असणारा दरारा जळगावातील वाढत्या गुन्हेगारी उपद्रवामुळे कमी होत चालला आहे.

गुन्हेगारांचा जोर, पोलीस कमजोर
पोलिसांचा धाक संपला : अंतर्गत वादविवाद चव्हाट्यावर
जळगाव : काही वर्षांपूर्वी पोलीस दादाचा असणारा दरारा जळगावातील वाढत्या गुन्हेगारी उपद्रवामुळे कमी होत चालला आहे. प्रभारी अधिकार्यांची कचखाऊ भूमिका, अंतर्गत वादविवाद आणि एकमेकाशी असलेले आर्थिक हितसंबंध यामुळे गुन्हेगार शिरजोर आणि पोलीस कमजोर होत आहेत.
जळगाव शहर हे जिल्हा पोलीस दलाचा चेहरा मानले जाते. मात्र हेच जळगाव काही महिन्यांपासून संवेदनशील होऊ पाहत आहे. त्यामुळे चोरी, दरोडे, हाणामारी, खून आणि अपहरण हे प्रकार नित्याचे झाले आहेत. संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तसेच कर्मचारी मात्र गुन्हेगारी घटनांबाबत सतर्क नाहीत.
पोलिसांसमोर हाणामारी नित्याची
उपद्रवी नागरिकांवरील पोलिसांचा वचक संपल्याने चक्क पोलिसांसमोर हाणामारीच्या तीन चार घटना या दोन महिन्यात घडल्या आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला दक्षता समितीच्या कार्यालयात दोन महिलांनी एकमेकींना मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना होत नाही तोच शनिवारी जिल्हा रुग्णालयात एमपीडीएच्या कारवाईतील आरोपी भगवान हटकर आणि मनसेचे नगरसेवक संतोष पाटील यांच्या गटात जिल्हा रुग्णालयात वाद झाला. भगवान हटकर याने हुज्जत घालत व शिवीगाळ करीत चक्क पोलिसांना आव्हान दिले आहे.
पोलिसांची विश्वासार्हता धोक्यात
८ जून रोजी कांचननगर भागातील निकेश सोनवणे या तरुणाला वाळू व्यावसायिक आबा बाविस्कर व त्याच्या सहकार्यांनी बेदम मारहाण केली. उपचारादरम्यान निकेशचा मृत्यू झाला. मारेकर्यांच्या दहशतीपोटी घटना पाहणारे आजूबाजूचे नागरिकच काय तर त्याचे कुटुंबीयदेखील फिर्याद देण्यासाठी पुढे आले नाहीत. पोलिसांकडून आपल्याला न्याय मिळेलच याची शाश्वती आजही सर्वसामान्य नागरिकांना नाही. पोलिसांबद्दल कमी होत असलेली विश्वासार्हता ही चिंतन करायला लावणारी बाब आहे.
अंतर्गत वादविवाद चव्हाट्यावर
पोलीसगिरीपेक्षा बहुतांश प्रभारी अधिकारी आणि कर्मचार्यांकडून आर्थिक हितसंबंधांना प्राधान्य दिले जात आहे. औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनमध्ये तीन दिवसांपूर्वी सट्टा व जुगार अड्डय़ावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या साहाय्यक फौजदार आणि प्रभारी अधिकारी यांच्यात वादाची ठिणगी पडली. देवाणघेवाणीतून सुरू झालेला हा वाद उपअधीक्षकांच्या दालनापर्यंत पोहचला. मात्र पोलीस स्टेशनच्या काही अनुभवी कर्मचार्यांनी मध्यस्थी करीत वाद मिटविला. तशीच काहीशी अवस्था शहर पोलीस स्टेशनची आहे. रामानंदनगर पोलीस स्टेशनला प्रभारी अधिकार्यांचा प्रभावच जाणवत नसल्याने कळत नकळत त्याचा भार दुय्यम अधिकारी आणि कर्मचार्यांवर येत आहे.
अवैध धंद्यांवरील कारवाई दोन दिवसात थंडावली
पोलीस प्रशासनातर्फे मागच्या आठवड्यात अवैध धंद्याच्या विरोधात मोहीम राबविली. स्थानिक गुन्हा शाखेने कारवाईत उडी घेतल्यामुळे स्थानिक पोलीस स्टेशनचीदेखील पंचाईत झाली. दोन दिवसात पेढीमालक व चालक यांच्यावर सात ते आठ गुन्हे दाखल झाले. नंतर अवैध धंद्यांच्या विरोधात कारवाईसाठी मैदानात उतरलेली स्थानिक गुन्हा शाखादेखील थंडावली. त्यामुळेच आंबेडकर मार्केट, रेल्वे स्टेशन परिसर, नेरी नाका स्मशानभूमी, नागसेननगर, कृषी उत्पन्न बाजार समिती या नेहमीच्या भागात सुरू असलेल्या सट्टा पेढीसोबतच शासकीय कार्यालयांमधील चालत्या बोलत्या सट्टा पेढीची भर पडली. ही बाब पोलीस प्रशासनाच्या नजरेत पडत नाही हे विशेष आहे. रावेर, फैजपूर, खानापूर यासारख्या सधन भागात सट्टा व जुगार अड्डे दिवसाढवळ्या सुरू असले तरी त्यावरील कारवाईचे धाडस केव्हा होणार हा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे.