कोरोना काळातही तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या ३५ दलालांचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:58 IST2021-02-05T05:58:55+5:302021-02-05T05:58:55+5:30
रेल्वे तिकिटांच्या काळाबाजार करणाऱ्यांविरोधात भुसावळ रेल्वे सुरक्षा दलातर्फे कारवाई मोहीम सुरूच असते. मात्र, कोरोना काळात ज्या विशेष रेल्वे ...

कोरोना काळातही तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या ३५ दलालांचा पर्दाफाश
रेल्वे तिकिटांच्या काळाबाजार करणाऱ्यांविरोधात भुसावळ रेल्वे सुरक्षा दलातर्फे कारवाई मोहीम सुरूच असते. मात्र, कोरोना काळात ज्या विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. त्या गाड्यांचे प्रवाशांना तत्काळ आरक्षित तिकीट मिळवून देण्यासाठी जळगाव, भुसावळ, नाशिक या ठिकाणी दलालांचा चांगलाच सुळसुळाट झाला होता. आयआरटीसीचे अधिकृत एजंट असतानाही तिकिटांचा काळाबाजार करणारे हे दलाल फेक आयडी आणि वेगवेगळ्या नावांच्या बवानट ओळखपत्राद्वारे तिकिटांचा काळाबाजार करीत असल्याचे रेल्वे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून तिकिटांचा काळाबाजार करताना विविध ठिकाणांहून ३५ दलालांना रंगेहाथ अटक केली आहे. या दलालांमध्ये बहुतांश युवक असून, सायबर क्षेत्रात हे युवक मास्टर माईंड असल्याचे समोर आले आहे. कारवाईनंतरही या युवकांवर रेल्वे पोलिसांचे विशेष लक्ष असून, या प्रकाराला पूर्णत: आळा घालण्यासाठी भुसावळ वाणिज्य विभागाने रेल्वे सुरक्षा बलाचे विशेष गुप्त वार्ता पथकही नियुक्त केले आहे.
इन्फो :
सहा महिन्यात ३५ दलालांचा पर्दाफाश
भुसावळ वाणिज्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार भुसावळ विभागात जुलै २०२० ते ३१ जानेवारी २०२१ दरम्यान विविध स्टेशनवरून ३५ दलालांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक नाशिक, जळगाव, भुसावळ व अकोला येथे कारवाया करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या दलालांकडून बनावट आयडी कार्ड, लॅपटॉप, विविध कंपन्यांचे मोबाइल सीम, स्कॅनर आदी साहित्य जप्त करून, सुमारे १० लाखांची तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये एकूण ३० गुन्हे दाखल असून, अटक झालेल्या दलालांना न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेनुसार जेलची हवाही खावी लागली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
इन्फो :
एक लाखांचा दंड वसूल
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांना अटक केल्यानंतर त्यांना रेल्वेच्या भुसावळ किंवा मनमाड येथील न्यायालयात हजर केले जाते. न्यायालयातर्फे चोरीचे प्रमाण लक्षात घेऊन रेल्वेचे नुकसान केल्याप्रकरणी योग्य ती शिक्षा ठोठावून दंड वसूल केला जातो. आतापर्यंत सापडलेल्या ३५ दलालांकडून एकत्रित एक लाखाचा दंड वसूल करण्यात आला आहे.
इन्फो :
रेल्वे प्रशासनातर्फे तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी कडक पाऊले उचलली असून, रेल्वेच्या सुरक्षा बल व वाणिज्य विभागातर्फे अशा दलालांवर कडक ‘वॉच’ आहे.
प्रवाशांनी अधिकृत एजंटकडूनच तिकीट बुकिंग करणे गरजेचे असून, जे कोणी तिकिटांचा काळाबाजार करण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर रेल्वेच्या नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल.
-युवराज पाटील, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक, भुसावळ रेल्वे विभाग.
इन्फो :
जुलै २०२० ते ३१ जानेवारी २०२१ दरम्यानची कारवाई
सापडलेले दलाल : ३५
गुन्हे दाखल : ३०
तिकिटांची रक्कम : १० लाख २ हजार रुपये
दंड वसूल : १ लाख रुपये