पाचोरा येथे कृषी विभागातर्फे ‘रानभाजी महोत्सव’ची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:23 IST2021-08-17T04:23:09+5:302021-08-17T04:23:09+5:30
कृषी विभागामार्फत ‘रानभाजी महोत्सव सप्ताह’ दि. ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट यादरम्यान साजरा करण्यात आला. या सप्ताहाचा ...

पाचोरा येथे कृषी विभागातर्फे ‘रानभाजी महोत्सव’ची सांगता
कृषी विभागामार्फत ‘रानभाजी महोत्सव सप्ताह’ दि. ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट यादरम्यान साजरा करण्यात आला. या सप्ताहाचा सांगता समारोप कार्यक्रम संपन्न झाला.
पाचोरा तालुका कृषी कार्यालयामार्फत पाचोरा कृषी कार्यालयाचे आवारात या सप्ताहाचे करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर पाटील, प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार कैलास चावडे, नगराध्यक्ष संजय गोहिल यांचे उपस्थितीत या सप्ताहाचा समारोप करण्यात आला. ‘विकेल ते पिकेल’ स्टॉलचेही उद्घाटन करण्यात आले. कृषी यांत्रिकीकरणअंतर्गत विविध योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या कृषी अवजारे व ट्रॅक्टरचे तसेच विविध यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत सोडत पद्धतीने निवड झालेल्या लाभार्थ्यांना निवड पत्रांचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
संयुक्त राष्ट्र महासंघामार्फत ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन, कृषी विभाग यांनी आदिवासींच्या जीवनात रानभाज्यांच्या संवर्धन व विक्रीतून समृद्धी आणण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. उपविभागीय कृषी अधिकारी नाईनवाड यांनी या कार्यक्रमात मोलाची माहिती दिली.
रानभाज्यांची ओळख, त्यांचे आहारातील महत्त्व, त्यांचे औषधी गुणधर्म, त्यांची पाककृतीबाबत प्रदर्शन करण्यात आले होते. तसेच यावेळी रानभाज्यांच्या संवर्धनातून आदिवासींची समृद्धी, रानभाज्यांची ओळख, रानभाज्यांचे औषधी गुणधर्म व पाककृती, त्यांचे आहारातील महत्त्व याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. याप्रसंगी सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक के. एफ. पाटील यांनी केले.
कृषी सहाय्यक विद्यापन पाटील यांनी आपल्या कवितेतून शेतकऱ्यांच्या व्यथा उपस्थितांसमोर मांडल्या. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी बी. बी. गोरडे यांनी केले. प्रमुख मार्गदर्शन किशोर पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. आभार मंडळ कृषी अधिकारी ए. व्ही. जाधव यांनी मानले. या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी रानभाज्यांची ओळख करून जास्तीत जास्त रानभाज्यांचा आहारात समावेश करावा, याबाबत कृषी विभागामार्फत आवाहन करण्यात आले.