कोरोनाच्या संकटात संधी शोधून ‘शवदाहिनी’चा स्तुत्य उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:59 IST2021-02-05T05:59:17+5:302021-02-05T05:59:17+5:30
जळगाव : आपला देश व राज्य वर्षभर कोरोनाच्या संकटात होते आणि त्या संकटातही संधी शोधली. संकट येतात, मात्र संकटालाही ...

कोरोनाच्या संकटात संधी शोधून ‘शवदाहिनी’चा स्तुत्य उपक्रम
जळगाव : आपला देश व राज्य वर्षभर कोरोनाच्या संकटात होते आणि त्या संकटातही संधी शोधली. संकट येतात, मात्र संकटालाही संधी शोधली पाहिजे. संकटाला संधी शोधून नेरी नाका स्मशानभूमीत जे शवदाहिनी बसविण्याचे काम झाले. हा अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचे मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शवदाहिनीच्या उद्घाटनप्रसंगी केले.
केशवस्मृती प्रतिष्ठानद्वारा नेरी नाका वैकुंठधामात उभारण्यात आलेल्या शवदाहिनीचे उद्घाटन रविवारी सकाळी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात झाले. यावेळी व्यासपीठावर महापौर भारती सोनवणे, आमदार सुरेश भोळे, उपमहापौर सुनील खडके, मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, मनपाचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, वैकुंठ शवदाहिनी प्रकल्प प्रमुख नंदू अडवाणी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शववाहिनी उभारण्याकरिता ज्यांनी मोठी आर्थिक मदत करणाऱ्या उद्योजक रिखबराज बाफनांसह दिलीप चोपडा, हरीश तोलानी यांचा सत्कार करण्यात आला.
इन्फो: दातृत्ववान नागरिकांमुळेच जळगावात शवदाहिनी -भरत अमळकर
भरत अमळकर यांनी रिखबराज बाफना यांनी जळगावातही शवदाहिनी बसविण्याबाबत कल्पना मांडली आणि मोठी आर्थिक मदत केली. बाफनांसह इतर दातृत्ववान नागरिकांमुळेच जळगावात केशव स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही शवदाहिनी कार्यान्वित करण्यात येत असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन मनीषा खडके यांनी तर आभार नंदू आडवानी यांनी मानले.
इन्फो :
आमदार भोळेंनी स्वीकारली १०० लोकांच्या अंत्यसंस्कारांच्या खर्चाची जबाबदारी
आमदार सुरेश भोळे यांनी निराधार, बेवारस व आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या एका वर्षात १०० लोकांच्या अंत्यसंस्काराच्या खर्चाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे सांगितले. तसेच समाजात अनेक गरीब कुटुंबाकडे अंत्यसंस्काराचे साहित्य घेण्यासाठीही पैसे नसतात. त्यामुळे जे बीपीएल रेशन कार्डधारक नागरिक आहेत, त्यांच्यावर मोफत अंत्यसंस्कार करण्याबाबतही मत व्यक्त केले.
इन्फो :
जळगाव ऐपत आणि दानत असणारेही लोक आढळले : आयुक्त
मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात, लोकसहभागाशिवाय कुठलाही कार्यक्रम यशस्वी होत नसल्याचे सांगितले. तसेच आपण अनेक शहरात काम केले. परंतु, ‘ऐपत’ अनेकांकडे असते. मात्र, देण्याची ‘दानत’ किती जणांकडे असते, हे माहीत नाही. मात्र, जळगावात ऐपत आणि दानत असणारे आणि दातृत्व असणारे लोक आढळले असल्याचे मत आयुक्तांनी यावेळी व्यक्त केले.